Anjali Damania vs Dhananjay Munde : अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंवर आरोपांची सरबत्ती
मुंबई: अंजली दमानिया यांनी बीड जिल्हा आणि येथील लोकांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले. मात्र, त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही. अंजली दमानिया यांना राजकारणात पुन्हा यायचे असेल. त्यामुळे स्वत:ची न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी अंजली दमानिया अशाप्रकारे आरोप करत आहेत का, हे बघितले पाहिजे. अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे आहेत. आम्ही शांत बसलो आहोत, असे कोणीही समजू नये. आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकचे काहीच नाही, असा समज कोणीही करुन घेऊ नये, असा इशारा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांना सविस्तरपणे प्रत्युत्तर दिले.
अंजली दमानिया यांनी आजपर्यंत अनेक लोकांवर आरोप केले. माझं मीडियाला चॅलेंज आहे की, यापैकी एकतरी आरोप टिकला आहे का? मला अंजली दमानियांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. अंजली दमानिया यांनी कृषी खात्याच्या खरेदीसंदर्भात घोटाळा झाल्याचे जे आरोप केले आहेत, ते धादांत खोटे आहेत. कृषी खात्याची खरेदी ही केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून झालेली आहे. आता राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीची खरेदी करताना अंजली दमानिया यांना विचारुन दर ठरवायचा का? त्या बोलतील तोच दर उचित, अन्यथा उचित नाही. त्यांना विचारुन दर दिला तर ते योग्य, नाहीतर भ्रष्टाचार म्हणायचा का, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या आडनावाचा उल्लेख 'बदनामिया' असा करत त्यांची खिल्ली उडवली.
या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात निर्माण होणाऱ्या राखेच्या आर्थिक व्यवहारासंबंधीच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. परळी औष्णिक केंद्रात जी राख तयार होते, ती त्यांनी स्वत:च्या खर्चाने काढावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. माझ्या कंपनीत पत्नीला दिलेले पद शासकीय आहे का? ही कंपनी 2006 पासून अस्तित्त्वात आहे. या राखेमुळे बीड जिल्ह्यात सिमेंट इंडस्ट्री आली. पूर्वी राख बॅगमध्ये राहत नव्हती तेव्हा राखेची तळी असायची. आमच्या परळीत अशी दोन-चार राखेची तळी आहेत. ती साफ करायला नको का? मे महिन्यात एप्रिल महिन्यात परळी परिसर राखेमुळे धुळीत माखलेला दिसतो. ऊर्जा विभागाने म्हणावं, ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे, असे आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले. साप साप म्हणून भुई थोपाटणे आणि एखाद्याचे राजकीय जीवन संपवणे सोपी गोष्ट नाही. दमानियांना माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम दिले असेल त्यांना आणि दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले.




