मुलुंडमध्ये मनसे-शिवसैनिकांमध्ये मनोमिलन, राज-उद्धव यांच्या युतीचे पोस्टर्स झळकले
MNS Shiv Sena Alliance : 'धडकी ठाकरेंची, महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिक, मुलुंड विधानसभा' असा उल्लेख असलेले बॅनर मुलुंडमध्ये झळकल्याचं दिसून आलं. त्याची राजकीय चर्चा सुरू आहे.

मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येतील अशी चर्चा राज्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता त्याची वेळ आली आहे, या दोघांची युती सत्यात उतरेल अशा विश्वास मुलुंडमधील शिवसैनिक आणि मनसैनिकांना आहे. त्यांनी तसे बॅनरही लावले आहेत. मुलुंडच्या कालिदास नाट्यगृह येथे आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'ठाकरेबंधू मनोमिलन' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. त्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे.
मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात होणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाबाहेर लावलेले 'ठाकरे मनोमिलन'चे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. "वाट बघतोय महाराष्ट्र, साद घालतोय महाराष्ट्र..! हीच ती वेळ, महाराष्ट्र हितासाठी..!" असे आशय असलेले मुलुंडमध्ये लावण्यात आलेले बॅनर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते.
या बॅनरवर 'धडकी ठाकरेंची, महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिक, मुलुंड विधानसभा' असा उल्लेख आहे. त्यामुळे मुलुंडमधील शिवसेना आणि मनसेमध्ये समेटाची शक्यता असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजकीय वर्तुळात याला ‘युतीची नांदी’ मानली जात आहे.
राजकीय नेत्यांकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी, हा प्रकार शिवसेनेतील संभाव्य एकत्रीकरणाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला आहे. थेट राज आणि उद्धव या दोन्ही भावांनी तसे संकेत दिले आहेत.
हे दोन भाऊ एकत्र येतील का? दोघंही एकत्र आले तर नेमकं काय होऊ शकतं? मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणं कसे बदलू शकतात? राजकारणावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याची चर्चा सध्या सुरू आहे.
दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे
मराठी माणसासाठी फक्त उद्धव आणि राज यांनीच नव्हे तर आदित्य आणि अमित यांनी देखील एकत्र आलं पाहिजे असं मत ठाकरे बंधूंचे चंदूमामा म्हणजेच चंद्रकांत वैद्य यांनी व्यक्त केलं. तसंच ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करण्यात हातखंडा आहे असं म्हणत त्यांनी संजय राऊतांचं देखील कौतुक केलं आहे.
नेत्यांची हातमिळवणी
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय कधी घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मात्र एकमेकांशी जोरदार शेकहँड केलं. मुंबईतील एका लग्नसमारंभात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते समोरासमोर आले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाईंनी हस्तांदोलन केलं. तसंच आता जोरदार हात मिळवूया असा संवाद देखील एकमेकांशी साधला. दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर फोटोसेशनसाठी एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

