Raj Thackeray Full PC : लोकल अपघात, राज ठाकरे यांचा संताप म्हणाले, मुंबई लोकलमध्ये शिरून दाखवा
मुंबई : दररोज 72 लाख प्रवासी प्रवास करणाऱ्या मुंबई लोकलचं (Local) भयाण वास्तव आज ठाण्याजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेनं समोर आलंय. मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 प्रवासी रेल्वेमधून ट्रॅकवर पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते, त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. त्यामुळे, झालेल्या अपघातात 13 प्रवासी खाली पडले आणि 4 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आता मुंबई लोकलचा सुरक्षित प्रवास आणि मुंबईतील (Mumbai) वाढती गर्दी यावरुन प्रतिक्रिया येत आहेत. लहानपणापासून मुंबईकर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया देताना तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला मागता, रेल्वेमंत्र्यांना तिथं जाऊन परिस्थिती बघू द्या, असेही राज यांनी म्हटले.
मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईतील रेल्वे कशी चालते हेच जगाला आश्चर्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. तर, मुंबईत नीट रस्ते नाहीत, पार्कींग व्यवस्था नाही. केवळ रेल्वेपुरता हा विषय नसून शहरांचा विचका झाला आहे, अशा शब्दात राज यांनी रेल्वे अपघातावर आपले मत मांडले. मुंबईसह मेट्रो शहरात उंच इमारती उभ्या राहत आहेत, रस्ते नाहीत, लोकं वाढल्याने पार्किंगची व्यवस्था नाही. आग लागली तर बंब जायला वेळ नाही, बाहेरून येणारे लोंढे आहेत. कोण येतंय, कोण जातंय हे कळत नाही. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आहे. कोण काय वापरताय हे कोणी बघत नाही. शहर म्हणून कोणी बघायला नाही. त्यामुळे, केंद्र सरकारने रेल्वेच्या स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

