वळण धोकादायक, पिक अवरमध्ये 6000 प्रवासी असल्याने लोकल एका बाजुला झुकते; प्रवासी संघटनेनं मांडलं वास्तव
मुंब्राच्या वळणाबद्दल आधी सुद्धा आम्ही रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. कारण, येथील वळणावर रेल्वे एका बाजूला झुकते, एका लोकलमध्ये 3600 प्रवासी प्रवास करतात.

मुंबई : राजधानी मुंबईतील लोकलचा (Local) प्रवास म्हणजे जीव मुठीत धरुन जगणं होय. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दररोज या लोकलने प्रवास करतात. साधारण, 1500 प्रवाशांची मर्यादा असलेल्या लोकमधून गर्दीच्या वेळी, कार्यालयीन वेळात तब्बल 5000 ते 6000 प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. आज सकाळी झालेल्या अपघातातही अशीच स्थिती होती. त्यामुळेच, रेल्वे प्रवासी संघटनेनं मुंब्रा (mumbai) येथील रेल्वे ट्रॅकच्या धोकादायक वळणाचं वास्तव कथन केलं आहे. येथील वळणावर रेल्वे एका बाजुला झुकते, तब्बल 6000 प्रवासी (Passenger) रेल्वेतून प्रवास करत असल्याने ट्रेन ओव्हरलोड होऊन एका बाजुला झुकते, असे रेल्वे प्रवासी संघटनेच्या सिद्धेश देसाई यांनी सांगितलं.
मुंब्राच्या वळणाबद्दल आधी सुद्धा आम्ही रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. कारण, येथील वळणावर रेल्वे एका बाजूला झुकते, एका लोकलमध्ये 3600 प्रवासी प्रवास करतात. मात्र, पिक अवरमध्ये एका लोकलमधील संख्या 6000 पेक्षा जास्त होते. जेव्हा ही संख्या जास्त होते तेव्हा लोकलमध्ये लोड येऊन ती एका बाजूला झुकते, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. आम्ही दिवा ते ठाण्यादरम्यान रेल्वे संख्या वाढवा हे वारंवार सांगतोय, पंतप्रधानांनी सुद्धा ही मागणी मान्य केली होती. मात्र, त्यावर कुठल्याही प्रकारे रेल्वे प्रशासनाने काम केलं नाही. जे वळण निर्माण झालं आहे, त्यावर इंजिनियर सुद्धा काही करू शकत नाहीत, असेही देसाई यांनी म्हटले. मात्र, हे धोकादायक वळण प्रवाशांसाठी जीवघेणे आणि रेल्वे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे हे वास्तव आहे.
वर्षभरापासून जीएमने भेटीची वेळ दिली नाही
मुंब्रा लोकल ट्रेन दुर्घटनेसंदर्भात प्रवासी संघटनांकडून मध्य रेल्वेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रवासी संघटनांना गेल्या वर्षभरापासून भेटीची वेळ दिली गेली नसल्याचेही त्यांनी म्हटलं. रेल्वेकडून रेल्वे आणि ट्रॅकवर खर्च न करता अमृत योजनेअंतर्गत स्थानकांवर अधिक खर्च केला जात असल्याचा आरोप प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख यांनी केला आहे. मध्य रेल्वेच्या जीएमकडून मिटिंगची वेळ मागणार, वेळ न दिल्यास आंदोलन करणार असल्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे.
प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली
मुंब्रा आणि दिवा दरम्यान लोकलमध्ये प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती, तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल धावत होती. त्यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावर असलेल्या प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली. त्यामुळे, काही प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. सकाळी 9.30 वाजता ही दुर्घटना घडली आणि 9.50 पर्यंत ॲम्युबलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेली आहे, अशी माहिती स्वप्नील निला यांनी दिली.
लोकल अपघात- मृतांची नावे
राहुल संतोष गुप्ता (28) रा. दिवा,
सरोज केतन (23) रा. उल्हासनगर
मयूर शाह (50)
मच्छीद्र मधुकर गोतरणे, वय-31 (पोलीस कॉन्स्टेबल)
2024 मध्ये रेल्वे अपघाताचे प्रमाण
( 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 ची आकडेवारी)
मध्यरेल्वे - मृत्युमुखी - १५३३ आणि जखमी - १६५५
पश्चिम रेल्वे - मृत्युमुखी ९३५ आणि जखमी - १०४२
मुंबई आणि उपनगर परिसरातील मध्य, आणि पश्चिम रेल्वेवरील अपघाताचे प्रमाण -
* लाईन क्रॉस करणे - मृत्युमुखी ११५१ तर जखमी २३४
* चालत्या ट्रेन मधून पडणे - मृत्युमुखी ५७० तर जखमी १३२९
* खांबाला आपटणे- मृत्युमुखी ६ तर जखमी ३८
* प्लॅटफॉर्म च्या गॅपमधून पडणे - मृत्युमुखी १४ तर जखमी १०
* इलेक्ट्रिक शॉक- मृत्युमुखी ३ तर जखमी १०
* आत्महत्या - मृत्युमुखी १२९ तर जखमी १
* आजारपणाने मृत्यू - मृत्युमुखी ५६२आणि जखमी ५९२
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

