Nashik Jindal Company Fire : तब्बल 60 तासांनी आग आटोक्यात आल्यानंतर नाशिकच्या जिंदाल कंपनीला 'क्लोजर नोटीस'; पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा संशय
Nashik Jindal Company Fire : इगतपुरीतील मुंढेगावजवळच्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला आग लागली होती. ही आग 60 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आली असली तरी आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

Nashik Jindal Company Fire : इगतपुरीतील (Igatpuri) मुंढेगावजवळच्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला (Jindal Company) आग लागली. ही आग 60 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आली असली तरी आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. या प्रकरणाचा आता एनडीआरएफ, बांधकाम विभाग, औद्योगिक सुरक्षा विभाग व प्रदूषण नियंत्रण अशा विविध विभागांच्या माध्यमातून सखोल चौकशी सुरू आहे. लवकरच त्यांचा अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असला तरी औद्योगिक सुरक्षा विभागाच्या वतीने कंपनीला 'क्लोजर' नोटीस (Closure notice) बजावण्यात आली आहे.
सन 2013, आणि 2023 मधील आगीच्या घटनेनंतर पुन्हा जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत अग्नितांडव झाल्याने फायर ऑडिट अहवालासह औद्योगिक सुरक्षा विभागाकडून नियमित तपासणी केली जाते. त्यासोबतच आढळलेल्या त्रुटींचे शेरे नोंदवले जातात, मात्र कंपनी प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळेच जिंदाल तिसऱ्यांदा आगीत खाक झाल्याचे शासकीय यंत्रणांकडून सांगितले जात असले तरी नियमित तपासणीनंतर दिलेल्या सूचनांचे पालन न करण्यातूनच जिंदालच्या आगीचे कारण समोर आल्याची चर्चा रंगत आहे.
तब्बल 60 तासांनंतर आग आटोक्यात
दरम्यान, इगतपुरीतील मुंढेगावजवळच्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला लागलेली आग तब्बल 60 तासांनंतर आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी तिची धग अजूनही कायम आहे. या आगीत 16 पैकी आठ प्रकल्प खाक झाले असून, सुमारे 90 टक्के उत्पादन भक्ष्यस्थानी सापडले आहेत. या भयंकर घटनेत दिलासा देणारी बाब म्हणजे आगीपासून 30 ते 60 मीटरवर ठेवण्यात आलेल्या अतिज्वलनशील प्रोपेन गॅस टाकीला या आगीपासून सुरक्षित ठेवण्यास यंत्रणेला यश आले आहे. या टाकीच्या स्फोटाने प्रकल्पासह सुमारे 15 किलोमीटरपर्यंतच्या परिसरावर दूरगामी परिणाम झाला असता. आगीमुळे धुराचे लोट उठल्याने आजूबाजूच्या गावातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी होणार आहे. कारखान्यात अग्निशमन यंत्रणा अपुरी होती, तसेच रासायनिक गळतीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेतून जिंदाल कंपनीसमोर गतवेळी उपस्थित केलेलेच प्रश्न आतादेखील उपस्थित केले जात असून, यंत्रणांचा थातूरमातूर अहवाल आणि कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा हेच आगीचे प्रमुख कारण असण्याची शक्यता नागरिक वर्तवत आहेत.
आगीच्या घटनेबाबत सखोल चौकशी होणार
आमच्या विभागाकडून नियमितपणे कंपनीची तपासणी केली गेली. मात्र, दरवेळी तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींबाबत शेरे कंपनी व्यवस्थापनाला दिले आहेत. सन 2023 साली लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी नाशिकच्या न्यायालयात खटला दाखल आहे. आता पुढील दोन दिवसांत या आगीच्या घटनेबाबतची सखोल चौकशी सुरू होणार असून, त्यानंतरच नेमके कारण समोर येईल, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाच्या सहसंचालकांनी दिली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
