तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, शिवसेनेचे दोन तुकडे होतील का? त्यानंतर तीन महिन्यात मनसेची स्थापना! अन् आज माय मराठीसाठी दोन बंधूंचा संयुक्त एल्गार
दोन बंधूमध्ये गेल्या 18 वर्षांपासून संवाद झालेला नाही. क्वचित प्रसंग सोडल्यास दोघांनी सुद्धा एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. मात्र, आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.

Uddhav Thackeray and Raj Thackeray: गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या मिलनाची चर्चा सातत्याने होत असतानाच मराठी भाषेच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातील मराठी धर्म बुलंद करण्यासाठी संयुक्त मोर्चाची हाक दिली आहे. एक दिवसांच्या अंतराने दोन मोर्चे होत असल्याने कोणताही वेगळा संदेश जाऊ नये, यासाठी दोन्ही बंधूंनी अखेर युतीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकताना 5 जुलै रोजी मोर्चा निश्चित केला आहे. त्यामुळे या निर्णयाचे मराठी माणसातून स्वागत केलं जात आहे. मात्र, हे सकारात्मक पाऊल फक्त मराठी भाषेसाठी न राहता महाराष्ट्र धर्म बुलंद करण्यासाठी दोघांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे, अशीही भावना आहे.
शिवसेना पक्षाचे दोन तुकडे होतील का?
दोन बंधूमध्ये गेल्या 18 वर्षांपासून संवाद झालेला नाही. क्वचित प्रसंग सोडल्यास दोघांनी सुद्धा एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. मात्र, आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे दोन्ही बंधूमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव कमी झाला आहे. यामध्ये साखरपेरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडूनही केली जात आहे. सामनामध्येही राज यांचे फोटो अलीकडील काळात छापून येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर 2005 मध्येही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज यांच्या बंडाची चाहुल लागताच शिवसैनिकांना उद्देशून लेख लिहित भावनिक आवाहन केलं होतं. तो दिवस होता 10 डिसेंबर 2005. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये शिवसैनिकांना उद्देशून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका स्तंभात लिहिले होते की, 'शिवसेना पक्षाचे दोन तुकडे होतील का? हे विभाजन कसे होईल? तुम्ही सर्वांनी या प्रश्नांची काळजी करणे थांबवावे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राची आणि स्वतःची काळजी करावी. आम्ही आमच्या गडाचे रक्षण करण्यास सक्षम आहोत. मी माध्यमांना सांगू इच्छितो की तुमच्या मनात जे काही आहे ते होणार नाही. शिवसेना अजिंक्य आणि अविनाशी आहे.'
एक चौकडी तुमची दिशाभूल करत आहे
ज्येष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांच्या 'द कजिन्स ठाकरे' या पुस्तकानुसार, '2005 मध्ये राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहून म्हटले की एक चौकडी तुमची दिशाभूल करत आहे तेव्हा वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, राज यांनी पक्षाच्या पराभवासाठी या चौकडीला जबाबदार धरले. राज या चौकडीतील उद्धव, मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई यांच्याबद्दल बोलत होते.' हे पत्र राज ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्धच्या बंडाची सुरुवात होती. डिसेंबर 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजीनामा त्यांच्या काकांना फॅक्स केला.
'द कजिन्स ठाकरे' नुसार, 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांच्या घराबाहेर हजारो समर्थकांची गर्दी जमली होती. येथे राज यांनी समर्थकांना सांगितले की, 'माझे भांडण माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्यांच्या सभोवतालच्या बडव्यांशी आहे. राजकारणाचा बाराखडी समजत नाही असे काही लोक आहेत. म्हणून मी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देत आहे. बाळासाहेब ठाकरे माझे देव होते, आहेत आणि राहतील.'
राजीनामा दिल्यानंतर राज भावनिकदृष्ट्या तुटले
शिवसेनेतून राजीनामा दिल्यानंतर राज भावनिकदृष्ट्या तुटले होते. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' म्हणजेच मनसे या पक्षाची घोषणा केली आणि म्हणाले की, हा पक्ष महाराष्ट्रावर राज्य करेल.
2002 मध्ये उद्धव पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर
बाळासाहेबांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी 2002 मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेच्या राजकीय कार्यक्रमात भाग घेतला. बाळासाहेबांनी या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी उद्धव यांच्यावर सोपवली. तथापि, या निवडणुकीच्या निकालामुळे उद्धव यांची शिवसेनेतील पकड मजबूत झाली. शिवसेना आणि भाजप युतीने 133 जागा जिंकून सत्ता कायम ठेवली. या सर्व घडामोडींदरम्यान एका मुलाखतीत राज यांनी तर म्हटले होते की, 'हो! मी दुःखी आहे.' असे म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या