'याला मराठी माणूस जाम चोपेल, भाजपला आमची विनंती की..'; मनसेच्या जाधवांचा गुणरत्न सदावर्तेंना सज्जड दम
सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, या अगोदर सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही त्याने उडी मारली.

मुंबई : ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळी मराठी माणसासाठी सर्वात पहिले पाऊल राज ठाकरे (Raj Thackeray) उचलतील आणि काल तसेच काही घडलं. राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला होता, दोन मोर्चा काढण्यापेक्षा एकच मोर्चा काढून आणि तो मराठी माणसाच्या हितासाठी असेल मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवू. न भुतो न भविष्यती असा कधीही महाराष्ट्रात झालेला नसेल एसा मोर्चा काढू, असे म्हणत मनसेचे (MNS) नेते अविनाश जाधव 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाबाबत माहिती दिली. तसेच, यावेळी या मोर्चाला विरोध करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. याला मराठी माणूस जाम चोपेल, आमची भाजपला विनंती आहे की, त्याच्या तोंडावर पट्टी बसवावी, असा शब्दात त्यांनी इशाराही दिला आहे.
सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, या अगोदर सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही त्याने उडी मारली. एवढीच हिंमत असेल तर जा ना तिकडे साऊथमध्ये. तू स्वत:ला एवढा ज्ञानी समजतो ना मग तिकडं जाऊन विरोध करुन दाखव. सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरुद्ध काम करतो, याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत. मी खात्रीने सांगतो याला मराठी माणूस एक दिवस जाम चोपेल. आमची भाजपला विनंती आहे की, याच्या तोंडाला पट्टी बांधावी, नाहीतर याच्या तोंडात दात नसतील, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला विरोध केला असून मोर्चाला परवानगी नसल्याचे म्हटले. तसेच, राज ठाकरे भाषिक वाद निर्माण करत असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावा, असेही त्यांनी म्हटले होते. त्यावरुन, मनसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सरकारला दिल्लीचे मनसुबे पुढे न्यायचे आहेत
माझा मुलगा 4 थीला आहे, सध्या तो बोलताना मराठी आणि हिंदी मिक्स करायला लागला आहे. हा जो विषय अनेकांच्या मुलांना होतोय त्यांना दोन भाषा एकत्र कराव्या लागल्या. पहिले वाक्य मराठीमध्ये, दुसरे दोन वाक्य हिंदीतले बोलून जातील. हा त्यांच्या मेंदूवर होणारा परिणाम आहे. आमच्या एका पदाधिकाऱ्याने हा विषय मांडल्याची माहिती जाधव यांनी सांगितली. हे सरकारला कळत नाही त्यांना दिल्लीचे मनसुबे पुढचे आहेत, ते टिकवायचे आहेत. म्हणून हे सर्व चालू आहे, पण आम्ही हे कधीही खरं होऊन देणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मनसे व आमच्यासोबत जे पक्ष येतील ते एकत्रितपणे या निर्णयाला विरोध करू, मोर्चा ही आमची पहिली पायरी आहे. यापुढे महाराष्ट्रात जे काही विरोध होतील त्याला झेलायला सरकारने तयार राहावं, असा इशाराही त्यांनी दिला.
शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ते आम्हाला सांगत होते कशाप्रकारे स्कोरिंग सब्जेक्ट सांगत होते. तबला, स्विमिंग अशा अनेक गोष्टी स्कोरींग सब्जेक्ट होऊ शकतात, असे राज ठाकरेंनी सूचवले होते. आम्हाला अशा कला क्षेत्रातली एखादी भाषा द्या, हिंदीच का? तुम्ही या सर्व गोष्टी करुन हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहात, असेही राज ठाकरेंनी म्हटल्याचे जाधव यांनी सांगितले.