पण आताच्या काळातही आम्ही काय सरकारी कार्यालय आणि मंत्र्यांकडे वाघ घेऊन जायचं का? ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेलांकडून व्यवस्थेला खडे बोल
39 वा शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापुरातील शाहू स्मारक इथं खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार पटेल यांना प्रधान करण्यात आला.

Jabbar Patel: लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा 39 वा शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापुरातील शाहू स्मारक इथं एका शानदार कार्यक्रमात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार जब्बार पटेल यांना प्रधान करण्यात आला. रोख रक्कम एक लाख रुपये, मानपत्र आणि शाल श्रीफळ असं पुरस्काराचे स्वरूप होतं. या कार्यक्रमांमध्येच जब्बार पटेल यांनी पुरस्कार स्वरूपात मिळलेली एक लाख रुपयांची रक्कम ही बाबा आमटे यांच्या आनंदवन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांना विभागून दिली. यावेळी बोलताना जब्बार पटेल सरकारी कार्यालयात होणाऱ्या ससेहोलपटवरुनही शाहू महाराजांचा किस्सा सांगत व्यवस्थेला खडे बोल सुनावले.
कोल्हापूरने जगाला काय काय दिलंय याची कल्पना तुम्हाला नाही. कोल्हापूर हे सिनेमातील एक स्कुल आहे, पण ते पुढं जपलं नाही. माझा पहिला सिनेमा कोल्हापुरात तयार झाला. भालजी पेंढारकर, लता दीदी माझ्या सिनेमाच्या शुभारंभला उपस्थित होते. माझं एक कोल्हापूरशी एक वेगळं नातं असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारी कार्यालय आणि मंत्र्यांकडे वाघ घेऊन जायचं काय?
जब्बार पटेल म्हणाले, शाहू महाराजांच्या कार्यकाळात आरक्षणाच्या फाईलवर पंतप्रतिनिधी सही करत नव्हता. त्यावेळी शाहू महाराज यांनी वाघाच्या पिल्लाचे भय दाखवून सही घेतली होती, पण आताच्या काळात आम्ही काय सरकारी कार्यालय आणि मंत्र्यांकडे वाघ घेऊन जायचे काय? मला कोणत्याही अधिकाऱ्याचे नेत्याचा अपमान करायचा नाही, कारण मी जे विचार सांगितले ते शाहू महाराजांचे आहेत, असे जब्बार पटेल म्हणाले.
आता किती मंत्री आहेत? किती अधिकारी आहेत?
त्यांनी पुढे सांगितले की, आज देखील बालविवाह होत असतील तर त्याकाळी शाहू महाराज यांच्यासमोर किती टास्क होते. शाहू महाराज यांच्यात पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा मिलाप होता. राज्य काय असते हे कळायचं असेल तर सगळ्यात आधी माणुसकी कळायला पाहिजे. आता किती मंत्री आहेत? किती अधिकारी आहेत? पण त्या काळी एकच कॅबिनेट होते ते म्हणजे शाहू महाराज होते. आता जे राजकारणात भले भले पोस्टर लागतात, तसे त्यावेळी देखील शाहू महाराज यांना करता आलं असतं, पण शाहू महाराज म्हणायचे आरोग्यचे काय प्रश्न आहेत? पैलवानांचे काय प्रश्न आहेत ते विचारायचे. ज्याला संगीत कळतं त्याला सगळं कळतं.
पण शाहू महाराज यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं
जब्बार पटेल यांनी पुढे सांगितले की, मला अनेक पुरस्कार मिळाले, पण हा पुरस्कार खरंच वेगळा पुरस्कार आहे. या भूमीतील कोणताही माणूस शाहू महाराज याचं देणं विसरू शकत नाही संविधानात शाहू महाराज यांचे अनेक विचार आहेत. लोकशाही नसताना लोकशाहीपेक्षा सामाजिक आणि मानवी मूल्ये जपणारा राजा या कोल्हापुरात जन्मला. तळागाळातील माणसांशी संबंध जोडायचा आणि त्याला आपलंसं केलं जायचं. शाहू महाराज यांची मूल्ये जपली गेली, कुणी विसरली नाहीत. भारतात आरक्षणाचा मुद्दा कुणाला लक्षात आला नव्हता, पण शाहू महाराज यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं असे पटेल म्हणाले.