ट्रेंडिंग
Rahul Gandhi : चूक नाहीच, तो गुन्हा होता; पाकिस्तानला पहिल्यांदा माहिती दिल्याने भारताने किती विमाने गमावली? सत्य देशाला कळलंच पाहिजे; राहुल गांधींनी तो व्हिडिओ शेअर करत पुन्हा घेरले
Rahul Gandhi on EAM Jaishankar : यापूर्वी, राहुल गांधींनी एस जयशंकर यांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. राहुल गांधींनी या व्हिडिओमध्ये जयशंकर यांनी दिलेल्या विधानावर प्रश्न उपस्थित केले होते
Rahul Gandhi on EAM Jaishankar : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर त्यांचाच व्हिडिओ शेअर करत घेरलं आहे. परराष्ट्र मंत्री (EAM) जयशंकर गप्प आहेत आणि हे मौन बरेच काही सांगत आहे. हे मौन गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. म्हणून मी पुन्हा विचारेन, पाकिस्तानला कसे कळले की आपण किती विमाने गमावली? ही केवळ चूक नव्हती. तो एक गुन्हा होता. देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
आमच्या हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा
एका खासगी वृत्तवाहिनीचा व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधी म्हणाले की, "आमच्या हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा होता. परराष्ट्रमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या कबूल केले आहे की भारत सरकारने हे केले." राहुल गांधींनी यावर प्रश्न उपस्थित केले आणि म्हणाले, "हे कोणी अधिकृत केले? यामुळे आपल्या हवाई दलाने किती विमाने गमावली?"
परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले
यापूर्वी, राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. राहुल गांधींनी या व्हिडिओमध्ये जयशंकर यांनी दिलेल्या विधानावर प्रश्न उपस्थित केले होते. राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान पोस्ट केले आणि असेही लिहिले की, "हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला सांगणे हा गुन्हा आहे." परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी एक निवेदन जारी करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या विधानाबाबत केलेल्या दाव्यांचे खंडन केले. राहुल गांधी यांनी दावा केला होता की, परराष्ट्रमंत्र्यांनी कबूल केले आहे की भारताने 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल पाकिस्तानला आधीच माहिती दिली होती. मंत्रालयाने अशा दाव्यांचा निषेध केला आणि म्हटले की तथ्ये विकृत पद्धतीने सादर केली गेली आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या बाह्य प्रचार विभागाने म्हटले आहे की एस. जयशंकर म्हणाले होते की "आम्ही सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा दिला होता, जो स्पष्टपणे 'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यातील बाब आहे." मंत्रालयाने म्हटले आहे की, "हे ऑपरेशन सुरू होण्यापूर्वीच घडले होते असे चुकीचे सादरीकरण केले जात आहे. तथ्यांचे पूर्णपणे चुकीचे सादरीकरण केले जात आहे."
राहुल गांधींनी कोणते आरोप केले?
राहुल गांधींनी मोदी सरकारवर आरोप केले आणि म्हटले की सरकारने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दहशतवादी पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्याची माहिती पाकिस्तानला दिली होती. राहुल गांधी यांनी या कृत्याला गंभीर उल्लंघन म्हटले आणि या हालचालीला कोणी मान्यता दिली हे स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यांच्या एक्स हँडलवर त्यांनी लिहिले की, "आमच्या हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा होता. परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीरपणे कबूल केले आहे की भारत सरकारने हे केले. याला कोणी परवानगी दिली? परिणामी आपल्या हवाई दलाने किती विमाने गमावली?" या आरोपांना उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाने राहुल गांधींचे दावे फेटाळून लावले आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला असा दावा केला.
इतर महत्वाच्या बातम्या