ट्रेंडिंग
खेळणं, जिंकणं यापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा; RCB जल्लोष, चेंगराचेंगरीवर गौतम गंभीरचं परखड भाष्य
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर परखडपणे भाष्य केलं आहे.
बंगळुरू : तब्बल 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान रायल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला मिळाला. पंजाब विरुद्ध बंगळुरु यांच्यातील अंतिम सामन्यात बंगळुरुने विजयी पताका फडकवली अन् आरसीबीचं विराट स्वप्न पूर्ण झालं. माजी कर्णधार विराट कोहलीने मैदानावरच हात टेकवत डोळ्यातून अश्रू ढाळले. त्यानंतर, आरसीबी चाहत्यांनी देशभर जल्लोष साजरा केला. चिन्नास्वामी स्टेडियम आणि बंगळुरुच्या रस्त्यावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, 18 वर्षांनी मिळालेल्या या यशाला चेंगराचेंगरीच्या घटनेनं गालबोट लागलं. दरम्यान, या घटनेनंतर आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. तर, टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरनेही त्याच्या स्टाईलने परखडपणे भाष्य करत, खेळणं, जिंकणं महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा लोकांचा जीव जास्त महत्त्वाचा असल्याचे म्हटले.
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर परखडपणे भाष्य केलं आहे. मी याअगोदरच सांगितलेलं आहे की, मी अशा रोड शोंवर विश्वास ठेवत नाही. खेळणं गरजेचं आहे, जिंकणं गरजेचं आहे, पण त्यापेक्षा जास्त गरजेचं, जास्त महत्त्वाचा आहे तो लोकांचा जीव. जर अशा परिस्थिताला नियंत्रण ठेवण्यास सक्षम नसू तर असे रोड शोंचे आयोजन न केलेलं बरं, अशा शब्दात गौतम गंभीरने बंगळुरुच्या विजयानंतर झालेल्या सेलीब्रेशन आणि रोड शोच्या चेंगराचेंगरीवर स्पष्टपणे मत मांडले. दरम्यान, आरसीबीच्या (RCB) विजयी सेलिब्रेशनदरम्यान हजारो चाहते एकत्र आल्याने चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर अचानक गोंधळ निर्माण झाला. अफवा आणि व्यवस्थेचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
आरसीबने IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) चाहत्यांनी बंगळुरु शहरात मोठ्या उत्साहात विजय साजरा केला. मात्र, या आनंदाला गालबोट लागलं, येथील चिन्नस्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 निष्पाप क्रिकेट चाहत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेकजण जखमीही झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत - विराट
एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर घडलेल्या दुर्घटनेनंतरही संघाचा सत्कार समारंभ मैदानात सुरूच होता. त्यावर, आता आरसीबी आणि विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. विराटने ट्विट शेअर करत म्हटले की, 'माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नाहीत... मी पूर्णपणे तुटून गेलो आहे." विराट कोहलीनंतर त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेही आरसीबी संघाच्या भावना शेअर करताना 3 तुटलेले हृदय पोस्ट केले. दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, विराट कोहली आयपीएल चॅम्पियन बनला आहे. त्यामुळे, विराटसह त्याच्या चाहत्यांकडून जंगी सेलिब्रेश केलं जात आहे.
हेही वाचा
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो