आधी सलीम कुत्तासोबतचे फोटो दाखवले, आता सुधाकर बडगुजरांच्या प्रवेशावर नितेश राणे म्हणतात....
उद्धव ठाकरे यांनी तातडीने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करुन पक्षातील नाराजांना थेट संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

नागपूर : राज्यात सध्या शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर चांगलेच चर्चेत आले असून नाशिक जिल्ह्यातील राजकीय नाट्याचा अखेर शेवट झाला आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची भाषा बदलली होती. मी पक्षात नाराज आहे, असे त्यांनी उघडउघड बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकारणाच्या रिवाजानुसार सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यातच, सुधाकर बडगुजर (Sudhakar badgujar) यांचा निर्णय होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षातून त्यांची हकालपट्टी करत त्यांना धक्का दिला. आता, बडगुजर यांचा भाजप प्रवेश चर्चेत असून भाजप नेत्यांकडूनही त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे ज्या भाजप नेत्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांसोबतचे फोटो शेअर केले होते, त्याच भाजपात आता बडगुजर जाणार असल्याने भाजप नेत्यांचीही गोची झाली आहे. एकेकाळी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या मंत्री नितेश राणे (Nitesh rane) यांनीही यावर सावध प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे यांनी तातडीने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करुन पक्षातील नाराजांना थेट संदेश दिल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखांसह इतर नियुक्त्या झाल्या होत्या. या नियुक्त्या करताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही, असे सुधाकर बडगुजर यांनी म्हटले होते. त्यामुळे, आपण नाराज असल्याचे सांगत त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. मात्र, बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला भाजप नेत्यांचाही विरोध दिसून येत आहे. नाशिकमधील आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. तसेच, आपल्यावर आरोप आणि गुन्हे झाकण्यासाठी कुणाला भाजपमध्ये यावे वाटत असेल तर ते चालणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बडगुजर भेटले असून प्रवेशाचा अधिकृत निर्णय झालाय अशी काही माहिती नाही. ते जे काही निर्णय घेतील त्यानंतर प्रतिक्रिया देणे योग्य होईल. मात्र, बडगुजरची हकालपट्टी झाली आहे, हे मी ऐकलं आहे. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा आपण बोलू, अशी सावध प्रतिक्रिया नितेश राणेंनी म्हटले. दरम्यान, बडगुजर यांच्यावर नितेश राणेंनी गंभीर आरोप केले होते. तसेच, दाऊदचा माणूस असलेल्या सलीम कुत्तासमवेतच्या पार्टीचे फोटोही त्यांनी यापू्र्वी शेअर केले होते. त्यामुळेच, आता राणेंनी सावधपणे भूमिका मांडल्याचं दिसून येत आहे.
आदित्य ठाकरेंनी नाव बदललं पाहिजे
आदित्य ठाकरे यांनी आपलं आडनाव ठाकरे बदलून घेतलं पाहिजे, आणि आदित्य खान आणि आदित्य शेख केलं पाहिजे, तेव्हा ते जास्त शोभून दिसेल. बाळासाहेबांचा नातू जर अशा पद्धतीने बोलणार असेल, तर तो ठाकरे आडनाव वापरण्याच्या लायकीचा नाही, अशी बोचरी टीका मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलीय.
दोन भाऊ म्हणून एकत्र आले तर चांगली गोष्ट
दोन्ही भावांनी काय करावं, हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, ते सोबत आले काय आणि नाही आले काय, कोणाचेही कुटुंबीय एकत्रित येत असेल, वाद मिटत असेल, तर चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये आम्ही विचार करणे, दखल घेणे, दु:खी होण्याची गोष्ट नाही. ठाकरे कुटुंब म्हणून ते एकत्रित येत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र, ज्यांनी त्यावेळेस ठाकरे कुटुंब तोडले, तेच आता एकत्र येण्याची गोष्ट करत आहे. जेव्हा राज साहेबांनी शिवसेना सोडली, तेव्हा संजय राऊत याची गाडी जाळण्यात आली होती. तेव्हा अनेक लोक शकूनी मामाच्या भूमिकेत होते. आता, तेच लोक दोन्ही भावांनी एकत्रित आले पाहिजे असे लेक्चर देत बसले आहेत, असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला.
दरम्यान, छोट्या तलावामधील मासेमारी कंत्राटावर स्टे लागू आहे. मोठ्या तलावाबद्दलचा स्टे उचलला आहे, त्यामुळे तिथे मसेमारीच्या कंत्राटसाठी स्पर्धा होईल. मासेमारांचा फायदा होईल, त्यातून भारतातील मासेमारीचे उत्पादन वाढेल, असे मंत्री महोदयांनी सांगितलं.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

