राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नको, पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे; सदावर्तेंचं गृहमंत्र्यांना पत्र

राज ठाकरे भाषेच्या आणि सांप्रदायिकतेच्या नावावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

Continues below advertisement

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सुत्री धोरणाचा अवलंब करत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध करत राज ठाकरेंनी 5 जुलै रोजी मुंबईत (Mumbai) मोठा मोर्चा काढणार असल्याचे घोषित केलं आहे. विशेष म्हणजे या मोर्चात सर्वच राजकीय पक्ष, मराठी कलाकारांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन राज यांनी केलं आहे. त्यादृष्टीन मनसैनिकांनी आता मोर्चाची तयारी सुरू केली असताना दुसरीकडे मुंबईतील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांनी राज ठाकरेंच्या मोर्चाला विरोध दर्शवला आहे. तसेच, राज ठाकरेंकडे मोर्चा काढण्यासाठी परवानगी मिळालेली नाही, असेही त्यांनी म्हटले.  

Continues below advertisement

राज ठाकरे भाषेच्या आणि सांप्रदायिकतेच्या नावावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तसेच, राज ठाकरेंना मोर्चासाठी परवानगी नसून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे, असेही सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सदावर्तेंना काय उत्तर देण्यात येतं ते पाहावे लागेल. 

शाळेत सुरू होत असलेल्या त्रिभाषा सुत्रीला विरोध दर्शवत हिंदी भाषेला राज ठाकरेंचा विरोध म्हणजे सरस्वती आईच्या विचारांना विरोध आहे. ते अगोदर बोलतात हिंदी भाषा नको, पुन्हा बोलतात हिंदी सक्ती नको, त्यांचा हा विरोध कशासाठी आहे? असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी विचारला आहे. आम्ही मनोज जरांगे यांच्या मोर्चालाही विरोध केला होता. आता, राज ठाकरेंच्या मोर्चालाही आमचा विरोध आहे. कारण, मोर्चा काढण्याचे ठिकाण गिरगाव नसून आझाद मैदान आहे. त्यामुळे, राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी न देण्याबाबत आम्ही मुंबई पोलीस, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याची माहिती सदावर्ते यांनी दिली. 

मोर्चात कोणताही झेंडा नसेल, मराठीचा अजेंडा असेल

“पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल.. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला हेही बघायचं आहे, या मोर्चात कोण सामील होतंय आणि कोण येणार नाहीत, हे देखील मला बघायचं आहे. शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते.. हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला 6 जुलैला कळेल…”, असे राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून सांगितले. 

हेही वाचा

इंजिनियरिंगसाठी 28 जूनपासून प्रवेश, डिप्लोमासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; मंत्री चंद्रकांत पाटलांचा निर्णय

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »