मोठी बातमी : राज ठाकरेंची गर्जना, 6 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा, हिंदीविरोधात आर-पारची लढाई
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आता येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी पूर्णपणे भूमिका फेटाळून लावली असून आम्हाला हे मान्य नसल्याचे सांगितले.

मुंबई : राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणत अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत असल्याचा दावा करत राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाला मनसेनं (MNS) थेट विरोध केला. त्यानंतर, राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत आज शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी आम्हाला शासनाची भूमिका अजिबात मान्य नाही. सरकारने पटवून देण्याचा विषयच येत नाही, आम्हाला भूमिका मान्य नाही असे राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी केले आहे. तर, 6 जुलै रोजी मराठी (Marathi) माणसांचा हा मोर्चा गिरगावहून निघेल, अशी घोषणाही राज ठाकरेंनी केली.
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आता येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी पूर्णपणे भूमिका फेटाळून लावली असून आम्हाला हे मान्य नसल्याचे सांगितले. खरतर 5 वी नंतरच पर्यायी भाषेचा मुद्दा आहे, त्यांना हेही सांगितले की NEP मध्ये असे काही नाही हे राज्यांवर टाकले आहे, मग ते का करत नाहीत, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तर, सीबीएसई या शाळा आल्या त्या आयएएस अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आल्या आहेत. त्या शाळेच वर्चस्व करण्याचे सुरू आहे आणि महाराष्ट्र हे का करत आहे? बाकी राज्य काही अशी भूमिका घेत नाही. आमचा या संपूर्ण प्रकरणाला विरोध आहे, असेल आणि राहणार असल्याचेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
मुंबईत 6 जुलै रोजी मराठी माणसांचा मोर्चा
हिंदी असेल किंवा इतर कोणत्या ही भाषेची सक्ती राहणार नाही. मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या 6 जुलैला आम्ही गिरगाववरून मोर्चा काढायचे ठरवरलं आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल, आम्ही सर्वांना या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. त्यामुळे, 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा असेल, मी रविवारी निवडला आहे कारण सर्व येऊ शकतील, हा मोर्चा गिरगाव ते आझाद मैदान असा असेल. मी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे, अशी घोषणाच राज ठाकरेंनी यावेळी केली. तसेच, महाराष्ट्राचं मराठीपण घालवायचा हा कट आहे, मी कट बोलतोय कारण हा कटच आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
मोर्चात सिने कलाकार येतील, तेही बोलतील
येत्या 6 जुलैला गिरगांव चौपाटीवरुन आम्ही मोर्चा काढायचा ठरवला आहे, या मोर्चात कुठलाही झेंडा नसेल. सर्व साहित्यिक, मराठी प्रेमी, सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावे. कारण, 6 जूलैच्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल तर मराठीचा अजेंडा असेल. या मोर्चात कोण येतंय हे मला बघायचंय, तसेच कोण नाही येत तेही बघायचंय, असा इशाराच राज यांनी दिला. कोणत्याही वादाशिवाय महाराष्ट्रहितासाठी एकत्र आलं पाहिजे या वाक्याचा अर्थ तुम्हाला मोर्चात कळेल. मोर्चात कोणते कलाकार येतायेत ते बघायचंय... मी बोलल्यानंतर ते येतील, माझे त्यांच्याशी बोलणे सुरू आहे. आपण विठ्ठल ला साकडे घालू, भाषा सोडून इतर कोणतीही एक्टिविटी करा, स्विमिंग शिकवा अशी सूचना देखील राज यांनी केली आहे.
दादा भुसे मराठी शिकूनच शिक्षणमंत्री झाले ना?
हिंदी भाषेसाठी शिक्षकांचा तुटवडा आहे, मी तेही म्हंटले की शिक्षक नाहीत. तर 10 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचे सरकार सांगत आहे. 90 हजारचे कंत्राट देऊन बसला आहात. जेएनपीटीला रिक्त पद आहेत आणि मुलाखती अदानी पोर्टवर, असा टोलाही राज यांनी लगावला. 10 हजार शिक्षक भरती करणार म्हणून सांगितलं, पण पगार द्यायला पैसे आहेत का? अनेक मोठे प्रश्न आहेत मग भाषेवर का येत आहे. काही मोठे लपवण्याचा प्रयत्न आहे का?. जेएनपीटी भरती आहे पण इंटरव्ह्यू अदानी पोर्ट मध्ये का चालू आहे? हिंदीमध्ये असे काय आहे, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तसेच, हिंदी शिकून चित्रपटात काम मिळणार आहे का, महाराष्ट्र शिक्षण पद्धतीमुळे मोठा आहे. मग असा काय साक्षात्कार आहे की हिंदी मुळे होणार आहे, असा सवाल राज यांनी विचारला. दादा भुसे पण मराठीतून शिक्षण घेऊन शिक्षणमंत्री झाले, का त्यांना स्विमिंग येत होतं म्हणून झाले. भाषा सोडून कला, क्रीडा याबाबत जर गुणवत्ता करणार असाल तर आमचा विरोध नाही.