Akola News : पातूर नगरपालिकेवरून राजकीय वादंग; आमदार नितीन देशमुखांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, नेमकं प्रकरण काय?
Akola News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागताच अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेतील प्रशासकीय भूमिकेवरून मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे.
Akola News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागताच अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेतील (Patur Nagarpalika) प्रशासकीय भूमिकेवरून मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी पातूर नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी सय्यद एहसानोद्दीन यांच्या त्वरित बदलीची मागणी करत राज्य निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार दाखल केली आहे.
सध्या पातूर नगरपालिकेत प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू आहे. त्याचदरम्यान, मुख्याधिकारी पदावर असलेले सय्यद एहसानोद्दीन हे पातूर शहराचेच रहिवासी असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता धूसर होण्याचा धोका असल्याचा गंभीर आरोप आमदार देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या मते, मुख्याधिकारी यांचे स्थानिक राजकीय घराण्याशी संबंध असल्याने निवडणुकीत एकतर्फी धोरण राबवले जाऊ शकते.
ट्रेंडिंग
निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातील मुद्दे
1. मुख्याधिकारी हे पातूरचेच स्थायिक नागरिक आहेत. त्यामुळे ते निष्पक्ष प्रशासन चालवू शकणार नाहीत.
2. त्यांचे स्थानिक राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत.
3. महसूल विभागाचे अधिकारी असूनही, शासन नियमानुसार नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावर नियुक्ती अवैध आहे.
4. नगर विकास निधीचा विनियोग नियमबाह्य स्वरूपात केला गेला आहे.
5. प्रभाग रचना पक्षीय हितसंबंध लक्षात घेऊन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
6. कामांचे तुकडे पाडून ठराविक व्यक्तींना लाभ मिळवून देण्याची प्रथा मुख्याधिकाऱ्यांकडून राबवली जात आहे.
7. याबाबत पालकमंत्री आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना वेळोवेळी कळवूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
राजकीय हस्तक्षेपाचे आरोप
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती गंभीर असून भाजप आपला पक्षीय अजेंडा राबवत असल्याचा आरोपही आमदार देशमुख यांनी केला. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या माध्यमातून हे नियोजन होत असल्याचे सांगत, देशमुख यांनी सरकार व प्रशासनावरही टीकास्त्र सोडले आहे.
सय्यद एहसानोद्दीन यांच्याकडे पातूरच्या मुख्याधिकारीपदाचा प्रभार
सय्यद एहसानोद्दीन हे बाळापुर तहसीलमध्ये नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. मात्र 13 मे 2023 पासून त्यांच्याकडे पातुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला आहे. त्यांच्या आधीचे मुख्याधिकारी शेषराव टाले यांची बदली झाल्यानंतर आतापर्यंतही पातुर नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्यात आलेला नाही. पातुरतेच रहिवासी असलेल्या आणि कारभार वादग्रस्त ठरलेल्या सय्यद अहिंसामुद्दीन यांना दोन वर्षानंतरही त्याच पदावर प्रभारी ठेवण्यामागे काय 'अर्थ' आहे, याची चर्चा पातुरकरांमध्ये आहे. सय्यद एहसानोद्दीन यांच्या कार्यकाळातील अनेक विकास कामातील गैरव्यवहाराची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे. निवडणुकीच्या काळातही पातुर शहराचा नागरिक असलेल्या व्यक्तीला त्या पदावरून आता निवडणूक आयोग हटवतो का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर जिल्हाभर आंदोलन पेटेल : आमदार नितीन देशमुख
आमदार देशमुख यांनी प्रशासन आणि निवडणूक आयोगाला इशारा देत म्हटले आहे की, "जर या अधिकाऱ्यांची त्वरित बदली झाली नाही, तर याचे पडसाद संपूर्ण जिल्हाभर उमटतील." त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
प्रशासन आणि आयोगाकडून अद्याप मौन
या तक्रारीबाबत प्रशासनाकडून आणि निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, या प्रकारामुळे राजकीय व प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली असून, पुढील हालचालीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी निर्णय अत्यावश्यक
पातूर नगरपालिकेतील प्रशासकीय कारभारावर लावले गेलेले आरोप हे निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी गंभीर प्रश्न उभे करतात. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन व सरकार यांनी त्वरित आणि स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, अशी स्थानिक जनतेची अपेक्षा आहे.
आणखी वाचा