Mumbai Metro 3 Rain news: गाजावाजा करत मेट्रो-3 लाइनचं उद्घाटन केलं, पावसाच्या पाण्याने पितळ उघडं पडताच प्रशासन म्हणालं....
Mumbai Metro Rain: मुंबईतील भुयारी मेट्रोची वाताहात, प्रशानाची मुजोरी, सत्यस्थिती दाखवण्यास मज्जाव, वरळी आचार्य अत्रे स्टेशन पाण्यात! मुंबईची ॲक्वा मेट्रो खरोखरच पाण्यात गेली

Mumbai Rain updates: तब्बल 12 दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने सोमवारी नागरिक आणि प्रशासनाची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. पहिल्या पावसात नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचे दिसून आले. मात्र, आता यामध्ये मेट्रो रेल्वेचीही (Mumbai Metro) भर पडली आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळी ही मेट्रो-3 मार्गिका नुकतीच पूर्ण क्षमतेने सुरु झाली होती. वरळी ते मरोळ या मार्गिकेचे (Metro Aqua Line) राज्य सरकारकडून अवघ्या काही दिवसांपूर्वीच लोकार्पण करण्यात होते. मात्र, मुंबईच्या पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोबाबत (Underground Metro Mumbai) गंभीर प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती सोमवारी पाहायला मिळाली. भुयारी मेट्रोच्या वरळी आचार्य अत्रे स्थानकात सोमवारी पाणी शिरले. हे पाणी आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाच्या छतातून खाली कोसळत होते. छतातून कोसळणाऱ्या पाण्याच्या धारांमुळे संपूर्ण स्थानक जलमय झाले होते. मेट्रो ट्रेनमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना या पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. त्यामुळे ॲक्वा लाईन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-3 चे आचार्य अत्रे स्थानक खरोखरच जलमय झाले होते.
पहिल्याच पावसाने मेट्रोची ही दुरावस्था उघडी पाडल्याने मेट्रो प्रशासनाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना याठिकाणी वृत्तांकन करण्यास बंदी केली. पत्रकारांना वरळी आचार्य अत्रे स्थानकातून हुसकावून लावण्यात आल्याचा प्रकार घडला. या सगळ्या प्रकारानंतर आता मेट्रो प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भिंत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. मात्र, एक बाब लक्षात घेतली पाहिजे, या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथे कायमस्वरुपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. (हे कायमस्वरुपी काम येत्या 3 महिन्यात होईल). मात्र तुर्तास तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु होते. हे पूर्ण काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसाने यामुळे ती पडली. खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळीपर्यंतची भुयारी मेट्रो वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे.मेट्रो-3 चे अभियंते आणि सुरक्षा चमू यावर युद्धपातळीवर काम करीत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Mumbai Metro Rain: भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकाची दुरावस्था कशी झाली?
पावसाचे पाणी हे भुयारी मेट्रोच्या स्थानकांमध्ये शिरले. पाण्याचा लोंढा आत शिरल्यामुळे भुयारी मेट्रो स्थानकांच्या छतामधून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले होते. एवढेच नव्हे पाणी शिरल्याने स्थानकातील सुरक्षा उपकरणे, चेकिंग पॉईंट, सरकते जिने आणि लाखोंच्या उपकरणांचे नुकसान झाले आहे. पाणी शिरल्यामुळे या मेट्रो स्थानकांमधील अनेक गोष्टी निकामी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या वस्तू भंगारात विकण्याच्या लायकीच्या झाल्या आहेत.
आणखी वाचा