मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट'संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिजन डॉक्युमेंटसंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.


नीती आयोगाने 'विकसित भारत 2047'चा आराखडा तयार केला आहे. यानुसार महाराष्ट्र राज्यानेही व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे अशा सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत असून त्याचे प्रारुप कसे असावे, त्यामध्ये काय समाविष्ट करावे याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा झाली. या व्हिजन डॉक्युमेंटचा पहिला प्रारुप आराखडा 15 ऑगस्टपर्यंत केंद्र शासनाकडे सादर करायचा असून अंतिम आराखडा हा 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करावयाचा आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे. तसेच हा आराखडा उपयोगात आणता येईल आणि अंमलात आणण्याजोगा असावा. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या ज्ञानानुसार योगदान दिल्यास हे उत्कृष्ट डॉक्युमेंट तयार होईल. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्हिजन डॉक्युमेंटसंदर्भात नागरिकांची मते जाणून घ्यावी. यासाठी व्हॉट्सॲप चॅट बॉट, ऑनलाईन सर्व्हे आदी माध्यमांचा उपयोग करावा. तसेच व्हिजन डॉक्युमेंटचा लोगो तयार करण्यासाठी नागरिकांसाठी स्पर्धा ठेवावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.


यावेळी 'विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.






इतर बातम्या :


महाराष्ट्र सरकार आणि ब्लॅकस्टोन समुहामध्ये सामंजस्य करार, राज्यात 5127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक;  27510 रोजगाराच्या संधी 


IPL 2025 : मुंबई इंडियन्स-आरसीबीला मिळाली गुड न्यूज! पण बाकी संघांना बसला दणका, आयपीएलमधून आणखी 3 खेळाडू बाहेर