मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज, फळबागांसह पिकासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?

Marathwada Weather Update: पुढील पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, परभणी कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला दिलाय.

Continues below advertisement

Weather Update: राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, नाशिकसह विदर्भ मराठवाड्यातही पावसाने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकुळ घातलाय. येत्या पाच दिवसात पावसाचा अंदाज कायम असून मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये प्रचंड उकाडा जाणवतोय. पावसाच्या शक्यतेमुळे अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाने बागायतदारांसह, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून येत्या पाच दिवसात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे? प्रादेशिक हवामान खात्याने काय अंदाज दिलाय? शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी? पाहूया.

Continues below advertisement

मराठवाड्यात येत्या 5 दिवसांत कुठे पाऊस?

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 मे रोजी बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, जालना, लातूर, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 14 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव व लातूर जिल्हयात तर दिनांक 15 मे रोजी बीड व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिवलातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस असलेल्या पिक, फळाची व भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भूईमूग पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागांची विशेष काळजी घ्या

घड लागलेल्या  केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. केळी बागेस आवश्यकतेनूसार सरी वरंब्याने पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी.

जोराच्या वादळी वाऱ्यामुळे फळगळ व फांद्या तुटल्या असल्यास पडलेली फळे व तुटलेल्या फ़ांद्या गोळा करून विल्लेवाट लावावी. आंबा बागेत पाण्याचा ताण बसल्यामूळे फळगळ होऊ शकते, फळगळ होऊ नये म्हणून आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. द्राक्ष बागेतील माती मोक्ळी करून खत व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी राहिली असल्यास छाटणी 15 मे पर्यंत करून घ्यावी. बागेची छाटणी पाऊसाचा अंदाज पाहूनच पाऊस नसताना करावी.

हेही वाचा:

Monsoon Rain: मान्सून राज्यात कधी येणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; पुणे वेधशाळेचं भाकीत

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »