ट्रेंडिंग
संपूर्ण गाव दोन दिवस बंद, जिथं शिक्षण घेतलं त्याच शाळेच्या पटांगणात अंत्यसंस्कार, अहिल्यानगरच्या ब्राम्हणवाड्याचा सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलातील संदिप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आलं आहे. संदिप गायकर हे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र होते.
Ahilyanagar : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलातील संदिप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आलं आहे. संदिप गायकर हे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र होते. या घटनेने ब्राम्हणवाडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळं ब्राम्हणवाडा गाव आज आणि उद्या पूर्णतः बंद ठेवण्यात आलं आहे. गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदिप यांनी शिक्षण घेतले त्याच विद्यालयाच्या प्रांगणात उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ब्राह्मणवाडा गावाजवळ असणाऱ्या आनंददरा या वाडीवर संदीप यांचे वास्तव्य होतं.
दरम्यान संदीपच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांवर मोठ संकट कोसळलं आहे. आपल्या घरातील एकुलता एक मुलगा निघून गेला याचा दुःख कुटुंबाला झालं आहे. दीड वर्षाचा मुलगा मागे ठेवून पत्नी व आई-वडील असा परिवार असताना संदीप यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. संदिप यांच्या मृत्यूने गावकरी शोकसागरात बुडाले असले तरी गावचा भूमिपुत्र देशासाठी शहीद झाला याचा अभिमान असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. एबीपी माझाशी बोलताना ग्रामस्थ आणि त्याच्या मित्रांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला 1 महिना पूर्ण
जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासातील निष्पाप पर्यटकांवरील सर्वात क्रूर दहशतवादी हल्ला 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये झाला. 22 एप्रिल 2025रोजी, चार दहशतवादी जंगलातून पहलगामच्या बैसरन खोऱ्यात आले. पर्यटकांचा धर्म विचारत त्यांनी 15 मिनिटे अंदाधुंद गोळीबार केला. त्यांनी एकूण 26 जणांना ठार मारले आणि पुन्हा जंगलात गायब झाले. या घटनेत महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश होता. या घटनेला आता एक महिना झाला आहे, सुरक्षा दल सतत कारवाई करत आहेत, परंतु त्या चार क्रूर दहशतवाद्यांना अद्याप पकडता आलेल नाही. पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर मोहीम पार पडली, अजून राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्या दहशतवाद्यांची माहिती मिळालेली नाही. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 23 एप्रिल रोजी, राष्ट्रीय तपास संस्थेची म्हणजेच एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, एनआयएने 27 एप्रिलपासून अधिकृतपणे या प्रकरणाचा तपास हाती घेतला. एनआयए प्रमुख सदानंद दाते या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत. एजन्सीचे आयजी, डीआयजी आणि एसपी दर्जाचे तीन अधिकारी तपासात गुंतले आहेत. एनआयएची एक टीम अजूनही पहलगाम आणि आसपासच्या भागात सतत तपास करत आहे. आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. यापैकी अनेक लोकांना दररोज पहलगाम पोलिस ठाण्यात हजर राहण्यास बोलावले जात आहे.
महत्वाच्या बातम्या: