ट्रेंडिंग
Maharashtra Weather Update : मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, इकडे राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर! अनेक जिल्ह्यांना झोडपलं, IMDचा इशारा काय?
Weather Update: राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. वळवाच्या या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून त्यात त्यांचे मोठं नुकसान झालं आहे.
Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात साधारण 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता (Weather Update) ही वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने (Rain Alert) सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. वळवाच्या या पावसाचा (Rain) सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून त्यात त्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यासोबतच, अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याच्या, तर काही ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
दरम्यान, आज (16 मे) राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह (40-50 किमी प्रतितास वेग) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह (50-60 किमी प्रतितास वेग), मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, संभाव्य इशारा लक्ष्यात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
धामणगावात बाजार समितीत शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान
धामणगाव शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र शेतकऱ्यांचे यात प्रचंड नुकसान झाले आहे. बाजार समितीत आपला माल घेऊन आलेले शेतकऱ्यांचं माल पावसाने अक्षरशः पाण्यात भिजलाय. माल ठेवण्यासाठी जो टिनशेड बनवला त्यात आउटलेट पाईपन टाकल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असल्याचं बोलल्या जातंय. बाजार समितीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना नुकसान भोगावे लागत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहे.
ज्वारी, भुईमूग, आंबा पिकांचे मोठं नुकसान
दुसरीकडे, करडच्या पाटण तालुक्यात वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावलीय. सलग दुसऱ्या दिवशी पाटण तालुक्याला पावसाने झोडपले आहे. दरम्यान आज सातारा जिल्ह्याला हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिणामी या पावसामुळे ज्वारी, भुईमूग, आंबा पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. काल (15 मे) दुपारपासून पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी आठवडी बाजारात व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालीय.
बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
बारामती तालुक्यातील कर्हाटी गावात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठा कहर केला. या अचानक हवामान बदलामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, लाखोंच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
यामध्ये शेतकरी सचिन मुरुमकर यांची अत्याधुनिक पद्धतीने केलेली डोबळी मिरची शेती संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या दुर्घटनेत त्यांचे अंदाजे 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
मुरुमकर यांनी कर्हाटी शिवारात आपल्या शेतात एक एकर क्षेत्रावर शेडनेट उभारून डोबळी मिरचीची शेती केली होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी हा हायटेक शेती प्रकल्प उभा केला होता. या प्रकल्पात शेडनेट, ठिबक सिंचन, सेंद्रिय खते आणि अन्य सुविधांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली होती. मात्र, गुरुवारी आलेल्या वादळी वाऱ्याने संपूर्ण शेडनेटचे संरचनाच उडवून लावले. लोखंडी पोल्स वाकले असून, शेडनेट पूर्णपणे फाटले आहे. त्यात लागवड केलेली डोबळी मिरचीही जमीनदोस्त झाली असून, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेनंतर गावातील शेतकरी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील इतर काही शेतकऱ्यांचेही पिकांचे नुकसान झाले आहे, परंतु सर्वात मोठा फटका मुरुमकर यांनाच बसला आहे. या घटनेची माहिती महसूल विभागास देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनाम्याची मागणी केली आहे. शासनाने या नुकसानीची गंभीर दखल घेऊन त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हे ही वाचा