Maharashtra Weather Update: कोकणात पावसाची तुफान बॅटिंग, वीजपुरवठा खंडित; नितेश राणे अधिकाऱ्यांना झापत म्हणाले, सुट्ट्या न घेता काम करा
Nitesh Rane: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट तर किनारपट्टी भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील सर्वच खात्यातील अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली.

सिंधुदुर्ग: दक्षिण कोकणातील पूर्वमध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत डिप्रेशनमध्ये परिवर्तीत होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी हे तीव्र दबाव क्षेत्र रत्नागिरीपासून अंदाजे 40 किमी वायव्य दिशेला केंद्रित झाले आहेत. हे तीव्र दबाव क्षेत्र (डिप्रेशन) पूर्वेकडे सरकत असून दुपारपर्यंत रत्नागिरी आणि दापोली दरम्यान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या डिप्रेशनच्या थेट परिणामी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरावर होणार असून या भागात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. एकुणात, कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग ताशी 44 ते 55 किमी राहण्याचा अंदाज असून हा इशारा लक्ष्यात घेता योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून किनारपट्टी भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 73 मी.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस कणकवली येथे 130 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर वेंगुर्ला 111 मी.मी. आणि देवगड 102 मी.मी. पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. तर समुद्रात चक्रकार स्थिती निर्माण झाल्याने वादळ सदृश्य स्थिती निर्माण होऊन समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे 3 नंबरचा बावटा लावण्यात आला असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मंत्री नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना झापलं, सुट्ट्या न घेता काम करण्याचे आदेश
दरम्यान, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या संभाव्य इशारा लक्ष्यात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बैठक ओरोस येथे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जिल्ह्यातील सर्वच खात्यातील अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. यात यावेळी विजेचा उडालेला बोजवारा संदर्भात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना अक्षरक्ष: खडे बोल सुनावत झापले आहे. अधिकारांना सुट्ट्या न घेता काम करा आणि जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. या साठी लागणारी यंत्रणा देतो, लोकांची मागणी पूर्ण करा असेही बजावून सांगण्यात आले आहे. विजेच्या मेंटेन्स वेळेवर करत नाही, एप्रिलमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या बाजूच्या झाड तोडली पाहिजे, ती तोडली नसल्याने या मुद्द्यावर बोट ठेवत अधिकाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी झापले आहे.
हे ही वाचा