Weather Update : कोकण किनारपट्टीवर काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, अरबी समुद्र खवळणार; अतिवृष्टीचा रेड अलर्ट, पुढील दोन दिवस कसं असेल हवामान?
Maharashtra Weather Update : सिंधुदुर्गात (Sindhudurg) गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पर्जन्यमानाप्रमाणेच पुढील दोन दिवसही धुवाधार पाऊस बरसण्याचा इशारा वेधशाळेकडून (IMD) देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update सिंधुदुर्ग: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावत सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. एकाएक वातावरणातील बदलामुळे (Weather Update) राज्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मध्यम ते दमदार पावसाच्या सरींने हजेरी लावली आहे. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचे ही मोठे नुकसान झाले आहे. मात्र ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. अशातच आज (24 मे 2025)देखील कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाचे ढग आहेत. तर कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा रेड अलर्ट(Red alert) हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
पुढील दोन दिवसही धुवाधार पाऊस बरसण्याचा इशारा
तर दुसरीकडे, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढणार असल्याने, कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. सिंधुदुर्गात (Sindhudurg) गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पर्जन्यमानाप्रमाणेच पुढील दोन दिवसही धुवाधार पाऊस बरसण्याचा इशारा वेधशाळेकडून (IMD) देण्यात आला आहे. दरम्यान मच्छीमारांनी समुद्र किनारपट्टीवर मासेमारी करता जाऊ नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोकण किनारपट्टी लगत ताशी 45 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मान्सून पूर्व पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे नदी-नालेही प्रवाहित झाले आहेत. जिल्ह्यात सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाची रिप रिप सुरूच!
सातारा जिल्ह्यात अद्याप पावसाची रिप रिप सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घाटरस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत. साताराकडून कास पठारकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उशिरा दरड कोसळली आहे. रात्री उशिरा ही दरड कोसळल्याने अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकले नाहीये. सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू असते. तर कास, बामणोली तसेच अनेक गावानं जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा सर्रास वापर करत असतात. त्यामुळे आता घाट माथ्यावरून प्रवास करताना वाहन धारकांना सतर्क राहावे लागणार आहे.
तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणी साठ्यात पावणेदोन टीएमसीने वाढ
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगरसाठी जीवनदायीनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार राहिलेली आहे. आणि यामुळे गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 1 पूर्णांक 89 टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे. सध्या उजनी धरणामध्ये एकूण 53 पूर्णांक 25 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उजनी धरण हे आजच्या स्थितीला मायनस 19 पूर्णांक 43 टक्के इतका आहे. मायनस मध्ये असलेलं उजनी धरण प्लस मध्ये येण्यासाठी आणखी 10 पूर्णांक 41 टीएमसी इतकी पाण्याची आवश्यकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
