170 किमीची अध्यात्मिक पदयात्रा पूर्ण, अनंत अंबानी 30 व्या वाढदिवसानिमित्त द्वारकाधीशाच्या चरणी नतमस्तक, रामनवमीनिमित्त दिल्या शुभेच्छा
Anant Ambani Padyatra: अनंत अंबानी यांची पदयात्रा जामनगर येथून सुरु झाली होती ती द्वारकाधीश मंदिरात पोहोचून समाप्त झाली आहे.

Anant Ambani Padyatra: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी यांची 170 किमीची पदयात्रा रविवारी 6 एप्रिलला द्वारकाधीश मंदिर येथे पोहोचल्यावर समाप्त झाली. अनंत अंबानी यांनी 30 व्या वाढदिवसानिमित्त भगवान द्वारकाधीशाला नमन केलं. यात्रेच्या समारोपावेळी अनंत अंबानींची आई नीता अंबानी आणि पत्नी राधिका मर्चंट सहभागी झाली. अनंत अंबानी यांची धार्मिक पदयात्रा 29 मार्चला जामनगर येथून सुरु झाली होती.
अनंत अंबानी यांनी ही यात्रा वैयक्तिक आणि अध्यात्मिक असल्याचं म्हटलं, ही यात्रा श्रद्धा, भक्ती आणि आशीर्वादानं परिपूर्ण राहिली. द्वारकाधीशाचं दर्शन घेतल्यानंतर अनंत अंबानींनी सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. एएनआयशी बोलताना अनंत अंबानी म्हटलं की ही त्यांची स्वत: ची धार्मिक यात्रा आहे. भगवानाचं नाव घेऊन सुरु झालेली यात्रा भगवानाचं नाव घेऊन समाप्त झाली. भगवान श्री द्वारकाधीश याची आमच्यावर कृपा आहे. यासाठी भगवान श्री द्वारकाधीशाला अधिक धन्यवाद देतो, असं अंबानी म्हणाले.
वडिलांनी नेहमी मला साथ दिली: अनंत अंबानी
अनंत अंबानी यांनी म्हटलं की आज माझी पत्नी आणि आई देखील आली आहे. माझ्या वडिलांनी मला नेहमी साथ दिली. या यात्रेसाठी मला त्यांनी शक्ती दिली. मी आजी, सासरे-सासू यासर्वांचे आभार मानतो, असं अनंत अंबानी यांनी म्हटलं.
आई म्हणून ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट- नीता अंबानी
अनंत अंबानी यांची आई आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनी एक आई म्हणून आपला सर्वात लहान लेक अनंतला द्वारकाधीशाच्या पवित्र स्थानाची पदयात्रा पूर्ण करणं अभिमानाची गोष्ट आहे. गेल्या 10 दिवसांपासून अनंत अंबानी यांच्या पदयात्रेतील सर्वजण संस्कृतीचा प्रचार प्रसार करत आहेत. मी द्वारकाधीशाकडे प्रार्थना करते की अनंत आणि त्यांना शक्ती द्यावी, असं नीता अंबानी म्हणाल्या.
राधिका मर्चंटनं म्हटलं की अनंतची इच्छा होती की लग्नानंतर पदयात्रा करावी. आज त्याचा 30 वा वाढदिवस आहे. आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्याचा वाढदिवस इथं साजरा करत आहोत. अनंतची पदयात्रा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद दिला त्या सर्वांचं आभार मानते, असं राधिका मर्चंट म्हणाल्या.
यात्रेवेळी कोंबड्यांना मुक्त केलं
अनंत अंबानी यांनी त्यांच्या पदयात्रेत कोंबड्यांनी भरलेली गाडी थांबवली. त्या गाडीत जवळपास 250 कोंबड्या होत्या. अनंत अंबानी यांनी त्या कोंबड्या दुप्पट रक्कम मोजून त्या कोंबड्यांना मुक्त केलं. त्यानंतर ते एक कोंबडी हातात घेऊन चालत जाताना दिसून आले.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनतारा चालवतात
अनंत अंबानी यांच्याकडून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी चालवलं जाणारं वनतारा चर्चेत आहे. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. वनतारा संरक्षण केंद्रात दोन हजारांपेक्षा अधिक प्रजाती आणि दीड लाखांहून अधिक संकटग्रस्त प्राण्यांचं घर आहे. वनताराला पशू कल्याणाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा प्राणी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
