Plane Crash in Ahmedabad: 31 मृतदेहांचे डीएनए जुळले, विजय रुपानी यांच्या मृतदेहाचे डीएनए जुळेनात, ओळख पटवण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच
Plane Crash in Ahmedabad: आम्ही उर्वरित मृतदेहांचे नातेवाईक येण्याच्या प्रतिक्षेत आहोत. ते आल्यावर उरलेले मृतदेह त्यांच्याकडे सोपवले जातील. ओळख पटविण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

अहमदाबाद: एअर इंडिया विमान अपघातासंदर्भात सातत्याने नवे अपडेट समोर येत असून, मृतांची संख्या 270 पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाचे अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी माहिती दिली की, 31 मृतदेहांच्या डीएनए (DNA) नमुन्यांचे जुळवाजुळव झाले असून, त्यापैकी 12 मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. डॉ. पटेल यांनी सांगितले की, “आम्ही उर्वरित मृतदेहांचे नातेवाईक येण्याच्या प्रतिक्षेत आहोत. ते आल्यावर उरलेले मृतदेह त्यांच्याकडे सोपवले जातील. ओळख पटविण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.” या दरम्यान, माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी (Vijay Rupani) यांचा मृतदेह अजूनही ओळख पटलेला नाही, अशी माहिती देखील डॉ. पटेल यांनी दिली.
“त्यांच्या डीएनएचा अद्याप मेळ बसलेला नाही. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच सुरू आहे. एकदा ओळख पटली की, आम्ही कळवू,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या अपघातानंतर राज्यभरात शोककळा पसरली आहे. अनेक कुटुंबांचे आधारवड हरपल्याने वातावरण भावनिक झाले आहे. सरकारी यंत्रणा, आरोग्य कर्मचारी, आणि तपास संस्थांकडून मृतदेह ओळख पटवण्याचे आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एअर इंडिया अपघाताचा तपास अजूनही सुरू असून, सरकारकडून यासंबंधी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया AI-171 विमान अपघातात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही मृत्यू झाला आहे. मात्र, त्यांच्या पार्थिवाची डीएनए तपासणी अद्याप पूर्ण झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. तरीदेखील विजय रूपाणी यांना अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजप प्रवक्ते राजूभाई ध्रुव यांनी माहिती दिली की, पार्थिव शरीर डीएनए रिपोर्टनंतर राजकोटमधील प्रकाश सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानी नेले जाईल. ग्रीनलँड चौक ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत अंत्ययात्रा नेण्यात येणार आहे.
एअर इंडिया चे AI-171 हे विमान 12 जून रोजी गुजरातमधून लंडनकडे जात असताना ही दुर्घटना घडली. या विमानात एकूण 230 प्रवासी व 12 क्रू मेंबर्स होते, म्हणजेच एकूण 242 प्रवासी होते. त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला असून फक्त एक प्रवासी, विश्वासकुमार रमेश (ब्रिटिश नागरिक) बचावले आहेत. ते इमर्जन्सी एक्झिटजवळील 11A सीटवर होते. अपघात इतका भीषण होता की, फक्त 31 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आहे आणि त्यापैकी 19 मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. बाकी मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेऊन तपासणी सुरू आहे. रूपाणी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार डीएनए अहवालानंतरच होणार असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.