ट्रेंडिंग
मी तुम्हाला 2 कोटी देते, माझ्या वडिलांना परत आणा; अपघातात वडिल गमावलेली लेक 'एअर इंडिया'वर संतापली
विमान दुर्घटनेनंतर आपल्या वडिलांवरील प्रेमभावना व्यक्त करताना लेकीच्या डोळ्यात संताप आणि अश्रू दोन्हीही एकाच वेळी दिसून येतं होतं.
अहमदाबाद : गुजरातमधील विमान दुर्घटनेनं (Ahmedabad plane crash) देश शोकसागरात बुडाला असून नातेवाईकांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत 241 प्रवासी आणि जिथं विमान कोसळलं त्या परिसरातील काही नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे, रुग्णालयात व घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेत आक्रोश केला. कुणी आपले आई-वडिल गमावले, कुणी कुटुंब गमावलं, कुणी मित्र तर कुणी आपली लेकरं या दुर्घटनेत गमावली आहेत. एअर इंडिया (Air india) कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळेच ही घटना घडल्याचा संतापही नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे. त्यातच, टाटा ग्रुपकडून जाहीर करण्यात आलेल्या 1 कोटी रुपयांच्या मदतीवरही एका पीडित लेकीने आपली भावना व्यक्त केली. तुम्ही एक कोटी रुपये देऊ इच्छिता, मी तुम्हाला 2 कोटी देते. फक्त माझे वडिल मला परत करा.. हे शब्द आहेत गुजरात (Gujarat) विमान दुर्घटनेत आपले वडिल गमावलेल्या लेकीचे. फाल्गुनीने रुग्णालयातच वडिलांच्या निधनाचा आक्रोश करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
विमान दुर्घटनेनंतर आपल्या वडिलांवरील प्रेमभावना व्यक्त करताना लेकीच्या डोळ्यात संताप आणि अश्रू दोन्हीही एकाच वेळी दिसून येतं होतं. फाल्गुनीचा तो संताप पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. एअर इंडिया कंपनीच्या विमान अपघातात वडिल गमावल्यानंतर फाल्गुनीने कंपनीने जाहीर केलेल्या 1 कोटी रुपयांच्या मदतीवरुन आपली भावना व्यक्त केली. तसेच, पैशाने तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता, पण वडिलांचं प्रेम नाही, असेही तिने म्हटले. .
मला कुणीतरी सांगावं, माझ्या वडिलांची काय चूक होती. ते विमानात बसले हीच त्यांची चूक होती का? एअर इंडियाने गंमत लावलीय का, काही उत्तर नाही, कुठलीही संवेदना नाही. 1 कोटी रुपये जाहीर केले, पण मला माझे वडिल परत करा... अशी आर्त हाक दुर्घटना पीडित लेकीने दिली आहे. पैशाने माणसं विकत घेता येतील का? आम्ही त्या पैशातून बेड खरेदी करू, पण त्या बेडवर झोप येईल का? जे प्रेम माझ्यावर माझे वडिल करत होते, ते प्रेम मला आता कुठं मिळेल? असा सवाल देखील फाल्गुनीने मीडियाच्या माध्यमातून एअर इंडियाला विचारला आहे.
मृतांच्या वारसांना टाटा ग्रुपकडून 1 कोटींची मदत
दरम्यान, एअर इंडिया कंपनीने विमान अपघाताच्या घटनेबाबत पत्रक जारी करत दु:ख, शोक व्यक्त केला आहे. या घटनेनंतरच्या भावना आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. आम्ही अपघातग्रस्त प्रवाशांच्या दु:खात सहभागी आहोत. अपघातातील मृतांच्या वारसांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, तसेच रुग्णालयातील जखमींचा खर्चही टाटा ग्रुपकडूनच केला जाईल, असे टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखर यांनी काल जाहीर केलं. मात्र, घरातील प्रिय व्यक्ती जाण्याचं दु:ख हे पैशात न मोजता येणारं आहे. त्यामुळेच, फाल्गुनीने संतप्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.