पाणीबाणी! बुलढाणा जिल्ह्यात 500हून अधिक गावात पाणी टंचाईच्या झळा; बारा दिवसानंतर पाणीपुरवठा, जलसंकट अधिक गडद होण्याची भीती
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 500 पेक्षा अधिक गावात नागरिकांना पाणीटंचाईच्या (Water Crisis) झळा बसत असून जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहराला सुद्धा बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे.

Buldhana Water Crisis News : राज्यातील तापमानाचा पारा जसा जसा वाढत आहे तशा तशा पाणीटंचाईच्या झळा ही नागरिकांना बसत आहे. बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana) तब्बल 500 पेक्षा अधिक गावात नागरिकांना पाणीटंचाईच्या (Water Crisis) झळा बसत असून जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहराला सुद्धा बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. शहरी भागात दहा ते बारा दिवसानंतर तर ग्रामीण भागात आठवडाभरानंतर पाणीपुरवठा होत आहे. मात्र सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर आणि चिखली तालुक्यात सर्वात जास्त गावांना पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे.
राष्ट्रीय पेय जल योजनेच्या अपूर्ण कामाचा नागरिकांना फटका
सिंदखेड राजा तालुक्यातील सिंधी या गावात कायमस्वरूपी पाणीटंचाई भासत असून शासनाने या गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर केली. कंत्राटदाराने गावाजवळ विहीरही खोदली, पाण्याची टाकी ही बांधली. मात्र पाईप लाईन टाकलीच नाही आणि हा कंत्राटदार संपूर्णपणे कामाचं बिल घेऊन निघून गेलेला आहे. गेल्या दोन वर्षापासून हे काम रखडल्याने या गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन-दोन ते तीन-तीन किलोमीटरवरून पायपीट करावी लागत आहे.
पाण्यासाठी ग्रामपंचमध्येच फाशी घेण्याचा प्रयत्न; उपसरपंचा ठेवले डांबून
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील चुरमुरा येथे पाण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये शेकडो ग्रामस्थ समोर गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सटवा बन्सी राठोड गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ग्रामस्थांनी आठ दिवसांपूर्वी ग्रामसेवक सरपंच व सर्व सदस्यांना निवेदने देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी केली होती. गावातील जलजीवन मिशनचे दोन वर्षापासून अद्याप पर्यंत पाणी मिळालेले नाही. चुरमुरा हे गाव अतिशय जंगलामध्ये असलेले गाव असून दूरवरून पाणी आणावे लागत आहे. यावेळी ग्रामस्थांनी उपसरपंच याना एका खोलीत डांबून ठवले असून ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे मागणी केली आहे.
पाच वर्षापूर्वी मंजूर पाणी पुरवठा योजनेचे अखेर आलं पाणी, पेढे वाटून आंदोत्सव साजरा
पाच वर्षापूर्वी मंजूर पाणी पुरवठा योजनेचे पाणी वरणगाव येथे पोहोचल्याने ग्रामस्थानी पेढे वाटून आंदोत्सव साजरा केला आहे. वरणगाव शहरातील पाणी टंचाई पाहता वरणगाव नगर पालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली होती. मात्र पाच वर्षात ही योजना पूर्ण करण्यात अनेक अडथळे येत गेल्याने ही पाणी पुरवठा योजना सुरू होईल किंवा नाही अशी साशंकता निर्माण झाल्याने, योजना सुरू करण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली, अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आले. या विविध आंदोलनाची दखल घेत शासनाने वरणगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची तातडीनं पूर्तता केल्याने या योजनेचे पाणी फिल्टर प्लांटपर्यंत पोहोचल्याने, आंदोलनाचे यश म्हणून सुनील काळे आणि ग्रामस्थानी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला आहे.
हे ही वाचा