Nana Patekar On Vaishnavi Hagawane Case: 'दौलतजादा करणारी, व्यसनाधीन माणसं समाजाचा भाग, हे वास्तव'; वैष्णवी हगवणे प्रकरणावर नाना पाटेकर थेटच बोलले
Nana Patekar On Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवीच्या सासरच्यांनी तिचा छळ केला, तिला मारहाण केली. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं आपलं आयुष्य संपवलं. यावर आता नाना पाटेकरांनी वक्तव्य केलंय.

Nana Patekar On Vaishnavi Hagawane Death Case: पुण्यातील (Pune News) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर (Vaishnavi Hagawane Death Case) संपूर्ण राज्यात संतापाची लाट उठली आहे. वैष्णवीच्या सासरच्यांनी तिचा छळ केला, तिला मारहाण केली. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं आपलं आयुष्य संपवलं. सध्या वैष्णवीचा नवरा, नणंद, सासू, सासरे आणि दिराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा हुंडाबळीची समस्या समोर आली.
याप्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांसोबत सेलिब्रिटींनीही (Celebrity) संताप व्यक्त केला आहे. अशातच आता वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी वक्तव्य केलं आहे. हुंडाबळी ही वृत्ती, अशा लोकांना कायद्यानुसार शिक्षा होईल, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे लग्नातील उधळपट्टी, सामाजिक प्रतिष्ठा हे मुद्दे चर्चिले जात आहेत, असंही ते म्हणाले. रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पाटेकरांनी या प्रकरणावर भाष्य केलंय.
हुंडाबळी ही वृत्ती, कायद्यानुसार शिक्षा होईल : नाना पाटेकर
दिग्गज अभिनेते नाना पाटेकर म्हणाले की, "हुंडाबळी ही वृत्ती आहे. अशा लोकांना कायद्यानुसार शिक्षा होईल. लग्नावर अनाठायी खर्च करायचा की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आणि संस्काराचा भाग आहे. माझ्यापुरते बोलायचे तर मी असा खर्च करण्यापेक्षा तो निधी वृद्धाश्रम, अनाथाश्रम किंवा मुलांच्या शिक्षणासाठी देईन."
वैष्णवी हत्या प्रकरणानंतर सध्या लग्नात केला जाणारा खर्च, समाजातील प्रतिष्ठा यांसारख्या गोष्टींवर चर्चा रंगल्या आहेत. यावर बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, "दौलतजादा करणारी आणि व्यसनाधीन माणसे समाजाचा भाग आहेत. अशी माणसे समाजात असतात, हे वास्तव नाकारता येणार नाही."
झाडावर रोग येतो म्हणून झाडे वाढवायची नाहीत का? फळं चाखायची नाहीत का? : नाना पाटेकर
नाना पाटेकर म्हणाले की, "झाडावर रोग येतो म्हणून झाडे वाढवायची नाहीत का? फळं चाखायची नाहीत का? लग्नसोहळे हा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येक क्षेत्रात विसंगती आहे. काय मूर्खपणा सुरू आहे, ही चर्चा करण्यापेक्षा मी काय करू शकतो, हा विचार आपण करावा. सिनेमा हे केवळ करमणुकीचं साधन नाही. समाजातील विसंगती आम्ही मांडतो. झपाट्यानं वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करण्याची वेळ आली आहे. अवकाळी, गारपीट यामुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सरकार पुरेसं नाही. खेड्यात शाळा लांब असल्यानं पावसाळ्यात मुलांचं शिक्षण थांबतं. हे टाळण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शाळा, वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. आजारी पडणे चैन झाली आहे, अशी वैद्यकीय व्यवस्था आहे", असं त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
