IPL 2025: गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळलं; शुभमन गिलच्या बहिणीच्या 'त्या' कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं
IPL 2025: आयपीएल 2025 मधील गुजरात टायटन्सचा प्रवास एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सकडून झालेल्या पराभवाने संपला. या पराभवानंतर प्रशिक्षक आशिष नेहराची मुले भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
IPL 2025: आयपीएल 2025 मधील गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) प्रवास संपला आहे. एलिमिनेटर सामन्यात गुजरातला मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) पराभव स्वीकारावा लागला. गुजरात सातत्याने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर राहिला. पण शेवटच्या दोन गट सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना एलिमिनेटर खेळावे लागले. जिथे मुंबई इंडियन्सने 20 धावांनी विजय मिळवला. आता हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) संघाचा सामना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जशी (Punjab Kings) होणार आहे.
आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
गुजरात टायटन्सच्या पराभवानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराची मुलगी आणि मुलाला अश्रू अनावर झाले होते. डावातील शेवटचा चेंडू टाकल्यानंतर, कॅमेरा गुजरात टायटन्स संघाच्या कुटुंबीयांकडे गेला. सगळेच दुःखात बुडाले होते. आशिष नेहराच्या मुला-मुलीच्या डोळ्यात अश्रू होते. तर शुभमन गिलची बहीणही गुजरातला पाठिंबा देण्यासाठी आली. यादरम्यान, शहनील गिल आशिष नेहराच्या मुलीला शांत करताना दिसून आली. तथापि, यावेळी ती देखील भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
ट्रेंडिंग
मुंबईच्या फलंदाजांचा स्फोटक खेळ
दरम्यान, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांनी मिळून 7.1 षटकांत 84 धावा जोडल्या. त्यानंतर बेअरस्टो 22 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांसह 47 धावा काढून बाद झाला. पण रोहित शर्माने 50 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह 81 धावा केल्या. रोहितच्या खेळीमुळे मुंबईने अखेर 20 षटकांत पाच गडी गमावून 228 धावांचा मोठा आकडा गाठला.
तर गुजरातकडून साई सुदर्शनने 49 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारासह 80 धावा केल्या पण शेवटी त्याची विकेट पडली तेव्हा गुजरातला सावरता आले नाही. गुजरातला फक्त 208 धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सने 20 धावांनी विजय मिळवला.
पराभवानंतर काय म्हणाला शुभमन गिल?
मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, शेवटची तीन-चार षटके आमच्या बाजूने गेली नाहीत, पण सामना चांगला होता. पॉवरप्लेमध्ये तीन झेल सोडल्यानंतर विजय मिळवणे कठीण होते, त्यामुळे गोलंदाजांसाठी परिस्थिती अधिक कठीण झाली. मागील दोन-तीन सामने आमच्या बाजूने गेले नाहीत, पण संघाने चांगली कामगिरी केली असे त्याने म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
MI vs GT Eliminator : 'या' पाच कारणांमुळे गुजरातचा घात झाला, मुंबई इंडियन्सने बाजी कुठे पलटवली?