BCCI vs Kochi Tuskers Kerala : बीसीसीआयला 538 कोटींचा झटका! ज्यांना IPLमधून हाकललं, आता त्यांच्याच पुढे झुकावे लागलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
आयपीएलमध्ये एकेकाळी कोच्ची टस्कर्स केरळ नावाची टीम खेळायची. मात्र वादग्रस्त घडामोडींमुळे ही फ्रँचायझी अचानक गायब झाली.
BCCI vs Kochi Tuskers Kerala News : आयपीएलमध्ये एकेकाळी कोच्ची टस्कर्स केरळ नावाची टीम खेळायची. मात्र वादग्रस्त घडामोडींमुळे ही फ्रँचायझी अचानक गायब झाली. आता ही टीम पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. कारण, कोची टस्कर्स केरळशी संबंधित एका प्रकरणात बीसीसीआयला मुंबई उच्च न्यायालयात मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने बीसीसीआयची याचिका फेटाळून लावत, या फ्रँचायझीला तब्बल 538 कोटी रुपये भरपाई देण्याचा मोठा आदेश दिला आहे.
ट्रेंडिंग
कोच्ची टस्कर्स केरळने आयपीएल 2011 मध्ये भाग घेतला होता. मात्र, त्यानंतरच्या हंगामात ही टीम आयपीएलमध्ये दिसलीच नाही. कारण, बीसीसीआयने या फ्रँचायझीचा करार रद्द केला होता. बीसीसीआयने त्यावेळी दावा केला की, फ्रँचायझीने बँक गॅरंटी भरली नव्हती.
या निर्णयाविरोधात फ्रँचायझीचे मालक रेंडेजवू स्पोर्ट्स वर्ल्ड आणि कोच्ची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड यांनी ट्रिब्युनलकडे धाव घेतली. त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, स्टेडियमची उपलब्धता आणि शेअरहोल्डर्सकडून मिळालेली मंजुरी उशिरा मिळाल्यामुळे ते वेळेत बँक गॅरंटी भरू शकले नाहीत. मात्र, बीसीसीआयने घाईगडबडीत घेतलेला करार रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता, असं त्यांनी स्पष्ट केलं.
फ्रँचायझीच्या बाजूने दिला निर्णय
जानेवारी 2012 मध्ये कोच्ची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडने बीसीसीआयला पत्र लिहून सांगितले की, ते आता लवादाकडे (आर्बिट्रेशन) जातील. ट्रिब्युनलने बीसीसीआयच्या सर्व युक्तिवादांना फेटाळून लावत स्पष्टपणे नमूद केले की, बीसीसीआयने कोच्ची टस्कर्स केरळचा करार चुकीच्या पद्धतीने रद्द केला होता. या निर्णयानुसार बीसीसीआयला 538 कोटी रुपयांची भरपाई 18 टक्के वार्षिक व्याजासह टीमच्या मालकांना द्यावी लागणार आहे.
पण, बीसीसीआयकडे अजूनही सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा मार्ग आहे. अंतिम निर्णय घेणे हे आता बीसीसीआयच्या हाती आहे. विशेष म्हणजे, कोच्ची टस्कर्स केरळने 2011 मध्ये जे खेळाडू संघात होते, त्यांच्यापैकी अनेकांना आजपर्यंत संपूर्ण मानधन मिळालेले नाही.
हे ही वाचा -