ट्रेंडिंग
आईच्या कुशीतच 1 वर्षाच्या बाळाने जीव सोडला; आगीनं अख्ख सोलापूर हळहळलं, अग्नितांडवात नेमकं काय घडलं?
सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमध्ये आज पहाटे तीनच्या सुमारास सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला भीषण आग लागली.
सोलापूर : अक्कलकोट एमआयडीसीतील उस्मानभाईंच्या कारखान्याला लागेल्या आगीच्या धुराने अख्ख्या सोलापूरवासीयांच्या (Solapur) डोळ्यात पाणी आलय. कारण, या दुर्घटनेत 8 निष्पापांचा जीव गेला असून एक वर्षाच्या चिमुकल्यानेही आपल्या आईच्या कुशीतच दम तोडला. नरसंहार ठरलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी जिवाच्या आंकातेने, मंंसुरी कुटुंबीय वरच्या मजल्यावरील बेडरुममध्ये गेले. पण, काळ बनून आलेल्या आगीत होरपळून उस्मानभाईंच्या कुटुंबीतील 5 जणांसह कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू झाला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच सकाळपासून कंपनीबाहेर स्थानिकांनी, सोलापूकरांनी धाव घेऊन मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र, नियतीपुढे सगळेच प्रयत्न फोल ठरले, वेळ आणि काळ आग बनून एकत्र आल्याने अनाकलीयन असं अघटीत घडलं.
उस्मानभाई म्हणजे दिलदार मनाचा माणूस, कंपनीतील कामगारांसाठी देवमाणूसच ते. म्हणूनच भयंकर आगाीत मालक कामगारांसाठी आणि कामगार मालकांसाठी धावून गेले. शेवटच्या क्षणापर्यंत सगळेच एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी आगीशी झुंजले. पण, या आगीतच सर्वांनी अखेरचा श्वास घेतला. उस्मानभाईचा नातू, मुलगा, सून अख्ख कुटुंबच या दुर्घटनेत संपलं. त्यात, निदान आपलं बाळं तरी या महाकाय आगीतून वाचावं म्हणून आईने 1 वर्षाच्या युसुफला आपल्या कुशीत घेतलं होतं. पण, आईसह चिमुकल्यानेही आईच्या कुशीतच जीव सोडला. बचावासाठी बेडरुममध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनाही आईच्या कुशीतलं बाळ पाहून गहिवरुन आलं होतं. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं सोलापूर (Solapur) शहर सुन्न झालं असून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतोय. कुणी रुग्णालयात धाव घेतोय, कुणी कंपनीच्या गेटबाहेर उभं राहून धुराचे लोट पाहतोय, तर कुणी मृतांबद्दल सहवेदन व्यक्त करत डोळ्यांतून अश्रू ढाळतोय.
पहाटे तीन वाजताच्या सुमारास लागलेल्या सेंट्रल इंडस्ट्री कारखान्यातील भीषण आगीच्या घटनेत माणुसकी धावून आली, पण नियतीपुढे कुणाचेही चालले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी स्वत:ला झोकून देऊन बचावकार्य केलं. पण, त्यांच्याही हाती फक्त मृतदेहच लागले. पहाटे 5.30 च्या सुमारास आगीतून तीन कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानानी बाहेर काढले होते. त्यानंतर, कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय आतच अडकल्याचे कळताच जवानांनी तब्बल 14 तास शर्तीचे प्रयत्न केले. आगीतून मार्ग काढण्यासाठी भिंत फोडून बेडरुममध्ये धाव घेतली. मात्र, बेडरुममधून उस्मानभाईंसह कुटुंबीयांचे 5 मृतदेहच त्यांच्या हाती लागले. सुरुवातीला हे पाचही जण बेशुद्ध असावेत असा अंदाज काहींनी लावला होता. कुणाचातरी श्वास सुरू असेल म्हणून लागलीच रुग्णावाहितकेतून रुग्णालयात गाठलं. मात्र, आगीच्या दुर्घटनेत सगळ्यांनीच दम सोडल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या भीषण घटनेत आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू या घटनेत झाला आहे. त्यामध्ये सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मंसूरी वय 87, अनस मंसूरी वय 24, शीफा मंसूरी वय 22, युसुफ मंसूरी वय 1 वर्ष, आयेशा बागवान वय 38, मेहताब बागवान वय 51, हिना बागवान वय 35, सलमान बागवान वय 38 असे होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
आईच्या कुशीतच बाळाने जीव सोडला
महाभंयकर आगीपासूनच्या बचावासाठी शीफा मंसुरी यांनी आपल्या बाळाला कुशीत घेतलं होतं. युसूफ मंसूरी हा 1 वर्षाचा चिमकुला आपल्या आईच्या कुशीत होता, पण आईसह त्या बाळानेही आईच्या कुशीतच जीव सोडला. या अत्यंत ह्रदयद्रावक घटनेनं संपूर्ण सोलापूर शहर हळहळलं आहे. दरम्यान, शर्थीच्या प्रयत्नानंतर 14 तासांनी संध्याकाळी 5 च्या सुमारास आग नियंत्रणात आली होती. मात्र, तासाभराने या आगीने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलंय. आग पुन्हा भडकल्याने पहाटेपासून काम करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानासमोर मोठे आव्हान उभं राहिलं आहे. हा संपूर्ण परिसर इंडस्ट्रिअल एरिया असल्याने दुसऱ्या कारखान्याना याचा फटका बसू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलला करावे लागत आहेत.
सर्वांची धावाधाव, हळहळ, आक्रोश
दरम्यान, या घटनेनंतर सोलापूर शहरातील मुस्लीम समाजातील विविध संघटना, मौलाना, स्थानिक नेते, दोन आमदार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी व मदतकार्यासाठी प्रयत्न केले. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी फोनवरुन संवाद साधत सर्वोतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, प्रयत्नांती केवळ मृतदेह आणि जळून राख झालेला कारखाना पाहून सर्वांचे डोळे पाणावले.