Vaishnavi Hagawane death: चॅटबद्दल सांगितल्यानंतर वैष्णवीचा वडिलांनी खरंच फोन काढून घेतला? काय म्हणाले अनिल कस्पटे...
Vaishnavi Hagawane death: वैष्णवीचे नको ते चॅट आम्ही पकडले त्यानंतर आम्ही याची माहिती तिच्या वडीलांना दिली होती. त्यावेळी त्यांनी तिचा फोन काढून घेतला असं हगवणेंनी म्हटलं होतं, त्यावर आज अनिल कस्पटेंनी भाष्य केलं आहे.

पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane death) प्रकरणात हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे. हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी कोर्टात असा दावा केला की, वैष्णवी नको त्या व्यक्तींशी चॅट करत होती आणि तिच्या मोबाईलमध्ये अशा चॅट्स हगवणेंनी पाहिले. एवढंच नाही तर, वकिलांनी वैष्णवीची मानसिक प्रवृत्ती आत्महत्येकडे झुकणारी असल्याचा दावा केला, जो वडिलांच्या मते पूर्णतः चुकीचा आणि असंवेदनशील आहे. या आरोपांनंतर वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत, हे दुर्दैवी आणि अमानुष आहे. जे लोक तिचा छळ करत होते, तेच आता तिची बदनामी करत आहेत. (Vaishnavi Hagawane death)
हगवणेंनी चॅटबद्दल मला काहीही सांगितलं नाही
हगवणेंचे वकील जे काही बोलले त्यावरती मला असं बोलायचं आहे त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेल्या बळी याला त्यांना कुठेतरी कलाटणी द्यायची आहे. केलेला तो गुन्हा लपवायचा आहे, म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलं आहे. आरोपींचे वकील जे काही बोलले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहे. वैष्णवी कोणाशी चॅट करायची त्याबाबत वडिलांना कल्पना होती, त्यावेळी तिच्या वडीलांनी तिचा फोन काढला होता, या हगवणेंच्या दाव्यावर अनिल कस्पटे म्हणाले, त्यांनी मला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती.
कोणत्याही चॅटबद्दल त्यांनी मला कधीही कोणतीही माहिती दिली नाही किंवा कोणतंही बोलणं याबाबत कधीही झालं नाही. त्यांनी मला त्याबद्दल पुसटशी कल्पना देखील दिलेली नव्हती. याबद्दल कधीही भाष्य झालेलं नाही. हे मोबाईल आणि चॅटिंग प्रकरणाद्वारे त्यांनी माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत संशय घेतला आहे, असंही अनिल कस्पटेंनी म्हटलं आहे.
आरोपीला देखील मी दीड लाखाचा मोबाईल घेऊन दिला
पुढे ते म्हणाले, दुसरी गोष्ट म्हणजे हगवणेंचा असा आरोप आहे की, माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतला होता. जर मला माझ्या मुलीचा मोबाईल काढून घ्यायचा असता तर मी तिला फोन का दिला असता. माझ्या मुलीला तर मी आधीच मोबाईल दिला होताच, त्या आरोपीला देखील मी दीड लाखाचा मोबाईल घेऊन दिला आहे. मोबाईल देखील त्यांनी मागितला होता. माझी मुलगी माझ्या घरी होती. तेव्हा तो वाकडच्या क्रोमा येथे आला आणि त्यानी वैष्णवीला बोलवून घेतलं. तिथे त्यांचं काहीतरी झालं, मला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे असं त्यानी सांगितलं. वैष्णवीने मला फोन केला त्याचे रेकॉर्डिंग देखील आहेत. फोनचा रेकॉर्ड त्यानी काढावा त्याद्वारे सगळं सिद्ध होईल. त्यांनी मला फोन केला आहे, त्या-त्या वेळी मी गेलो आहे. त्यांच्या मागणीनुसार मी त्यावेळी त्यांना मोबाईल दिला होता. त्याचे ईएमआय देखील मी आज भरत आहे, अशी माहिती देत अनिल कस्पटेंनी त्या फोनचे बील देखील दाखवले आहे.
एमजी हेक्टर बुक केली म्हणून त्यांनी माझ्याशी वादावादी केली
पैशांसाठी, हुंड्यासाठी छळ केला नाही असं ते म्हणत आहेत, गाडी मागितली नाही म्हणत आहेत, त्यांच्याकडे पाच कोटीची गाडी आहे असंही ते म्हणतात, मी सांगतो, लग्नाच्या आधी मी त्यांच्यासाठी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. फॉर्च्यूनर गाडी घ्यायच्या आधी एमजे हेक्टर ही गाडी मी लग्नात त्यांना द्यायला बुक केली होती. गाडीसाठी पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले होते, एमजी हेक्टर बुक केली म्हणून त्यांनी माझ्याशी वादावादी केली. तेव्हा ते मला म्हणाले होते, ही गाडी मला दिली तर मी सोडून देईन किंवा पेटवून देईल. मला गाडी पाहिजे तर फॉर्च्यूनरच पाहिजे. त्यामुळे मी फॉर्च्युनर गाडी लग्नात दिली. त्यांच्याकडे एकच गाडी आहे. पाच गाड्या नाहीत किंवा दहा गाड्या नाहीत. पाच कोटीच्या देखील काही नाहीत. त्यांच्याकडे निव्वळ एकच गाडी आहे. फोर्ड गाडी आहे आणि दुसरी जी काही गाडी ते 90 लाखाची सांगत आहेत. ती गाडी दुसऱ्या व्यक्तीची आहे. ही गाडी पोलीस स्टेशनला लावलेली आहे. तुम्ही देखील जाऊन चेक करा कोणाच्या नावावर ती गाडी आहे. यांच्याकडे कुठलीही गाडी नाही, एकच गाडी आहे आणि ही जी मी गाडी दिलेली आहे ती दिली नसून माझ्याकडे मागितली गेली आहे, असंही अनिल कस्पटेंनी म्हटलं आहे.
चांदीची भांडी, चांदीच्या ताटाची,गौरीची मागणी
माझ्या मुलीच्या लग्नात केलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मी लग्नाला उभे राहणार नाही म्हणून त्यांनी धमकी दिली होती. आधीच माझ्या मुलीची त्यांनी दोन लग्न देखील मोडली होती, त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं, त्यात लग्नाला तयार झालो तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली होती. माझ्याकडे त्यांनी सोन्याची मागणी केली होती, चांदीची मागणी केली, चांदीची भांडी, चांदीच्या ताटाची,गौरीची मागणी केली होती. आदीकमासात चांदीचा ताट मागितलं. ज्याच्या-त्याच्या ऐपतीप्रमाणे जे ते ताट देतात. कोण स्टीलचा देतात, कोण तांब्याचं ताम्हण देतो, माझ्याकडे त्यांनी चांदीच्या ताटाची मागणी केली, ती देखील मी पूर्ण केली. थोड्याच दिवसात सर्व गोष्टींचा उलगडा होईल असे पुढे अनिल कस्पटे यांनी म्हटलं आहे.
अनिल कस्पटे यांनी निलेश चव्हाण वरती भाष्य करताना म्हटलं की, जर त्यांची सून मयत झालेली आहे. तर त्यांना हे सगळं कसं सुचलं की, बाळाला सांभाळायला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे द्यायचं. जर आपली सून घरात मयत आहे आणि तो निलेश चव्हाण त्यावेळी त्यांच्या घरी कसा होता. असंही ते पुढे म्हणालेत .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
