दोन तास आमच्याकडे ईडी, सीबीआय अन् पोलीस आले तर 90 टक्के भाजप आऊटगोईंग करेल : संजय राऊत
Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही कोणत्याही प्रकारचा दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तर दुसरीकडे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे पाच खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, आऊटगोईंग वगैरे शब्द बंद करा. पैशाच्या ताकदीवर लोक विकत घेणं किंवा तपासी यंत्रणांच्या दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडणे, याला आऊटगोईंग, इन्कमिंग या शब्दांच्या उपमा तुम्ही देऊ नका. मी मागेही म्हणालो आहे की, दोन तास आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि पोलीस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापासून भाजप हा 90% आऊटगोईंग करेल. याला तुम्ही फार मोठं वैचारिक पक्षांतर, असे म्हणणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. कोणाला जायचे आहे? कोणाला थांबायचे आहे? हा त्यांचा प्रश्न आहे. पण, पक्षात राहून जर पक्षाविरोधात कारवाई कराल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही कोणत्याही प्रकारचा दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. हा पक्ष देशाच्या राजकारणातला सर्वात जुना पक्ष आहे. भले अमित शाह यांनी सूड घेण्यासाठी पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला असेल, आमदार, खासदार, एकनाथ शिंदे यांच्यासारखे लोक फोडले. पण, मूळ पक्ष हा मूळ पक्षाच आहे. भविष्यात शिवसेना काय आहे? हे अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना समजेल, असा हल्लाबोल त्यांनी केला.
ट्रेंडिंग
हा विषय आमच्यासाठी संपला
सुधाकर बडगुजर म्हणाले की, मी पक्षशिस्तीचा काय भंग केला? याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. त्याच्यावरती चर्चा करण्या इतपत आता आमच्याकडे महत्त्व नाही. काय असेल ते आम्ही चर्चा करू. पण, पक्षाप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीचे नसते. फार विचार केला जातो. आपापसात चर्चा केली जाते. स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतर अशा प्रकारची कारवाई केली जाते. चुकीच्या कारवाया आमच्याकडून होत नाही. मी म्हणजे पक्ष हे धोरण शिवसेनेत कधीच राबवले गेले नाही, असे त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला काही काम नाही
ठाकरे गटाचे पाच खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अशी माहिती कोण देत आहे? मी असे म्हणालो त्यांच्या पक्षातले सहा खासदार हे उद्या भाजपत सामील होत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यांच्या पक्षातले 22 आमदार हे अजित पवार गटात सामील होताय, आणि उरलेले दहा गिरीश महाजन खिशात घेऊन फिरत आहे तर त्याच्यावर तुमचे काही म्हणणे आहे का? माझी सूत्रांची माहिती पक्की आहे. गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांचा पक्ष फोडत आहेत, ही सूत्रांची माहिती आहे. ते खाजगीत असेही बोलताय की, एकनाथ शिंदे यांचा पक्ष मी जमीनदोस्त करेल. त्यांची आणि फडणवीस यांची अशी चर्चा सुरू आहे. यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला काही काम नाही. नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जडलेला आहे. तो काही त्यांचा दूर होत नाही. ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले आहेत. ही नाराज सेना आहे. या नाराज सेनेवर तुम्ही काय लक्ष ठेवत आहात? महाराष्ट्र केसरीला पक्षात घेतलं, याला पक्षात घेतले त्याला पक्षात घेतले या व्यतिरिक्त जनतेच्या हिताची त्यांनी काही भूमिका मांडली आहे का? बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेता लाज वाटली पाहिजे. या देशात नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी अराजक माजवला आहे, जे शिवसेनाप्रमुख सांगायचे या देशामध्ये अराजक माजेल त्या अराजकाला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आहे. तुम्ही त्या अराजकात सहभागी झालेला आहात, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आणखी वाचा