Sanjay Raut : वाल्मिक कराडचं काम संपल्यानंतर...; पोलीस डायरीतील नोंदीची चौकशी का झाली नाही? कासलेंच्या दाव्यानंतर संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी कोट्यवधींची ऑफर होती, असा खळबळजनक दावा निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी केलाय.

Sanjay Raut : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder Case) मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी कोट्यवधींची ऑफर होती, असा खळबळजनक दावा निलंबित पीएसआय रणजित कासले (Ranjit Kasle) यांनी केलाय. सायबर विभागात असताना आपल्याला बोलावून ही ऑफर दिल्याचा दावा कासलेंनी केलाय. तर एन्काऊंटरच्या ऑफरची माहिती स्टेशन डायरीमध्ये नोंदवल्याचेही कासले यांनी म्हटले आहे. आता कासले यांच्या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सवाल उपस्थित केलाय.
नाशिक येथे पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, नाशिकमध्ये शिवसेनेचे शिबिर होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज संध्याकाळी शहरात एक बाईक रॅली काढण्यात येणार आहे. मशाल हातात घेऊन ही रॅली निघणार आहे. आदित्य ठाकरे आज संध्याकाळी नाशिकमध्ये येणार आहेत. उद्या दुपारपर्यंत उद्धव ठाकरे उद्या येणार आहेत. बाळासाहेब ठाकरे आज असते तर आज काय बोलले असते? या बद्दल उत्सुकता असतो. मुंबईमध्ये याबाबत प्रयोग झाला आहे. उद्या नाशिकमध्ये काय होतेय ते पाहू, असे संजय राऊत यांनी सांगितले.
वाल्मिक कराडचं काम संपल्यानंतर...
बीडचे निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांनी आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती, असा दावा केला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्यांचे असे म्हणणे आहे की, त्या संदर्भात मी पोलीस डायरीत नोंद केलेली आहे. त्यांचा स्टेटमेंट आहे की, मला एन्काऊंटर करण्याच्या सूचना होत्या. म्हणजे फेक एन्काऊंटर या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात घडलेले आहेत. त्याला पुष्टी देणारे त्यांचे विधान आहे. पण याची चौकशी होणे गरजेचे आहे. जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की, मी अशा प्रकारची नोंद पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर आहे. जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्यावर त्यावेळीच कारवाई का झाली नाही? वाल्मीक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं, असा एक प्लॅन मला दिसतोय. याच्या मागे कोण होता? हे लोकांसमोर यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
मतांची किंमत आता पाचशे रुपयांवर
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, यावर आता लाडक्या बहिणीने प्रश्न विचारले पाहिजे. ज्या लाडक्या बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, त्या मतांची किंमत आता पाचशे रुपयांवर आली आहे. राज्य आर्थिक संकटात आहे. फडणवीस कितीही बोलले तरी आर्थिक संकटात हे राज्य सापडले आहे. अजित पवार बोलत नसले तरी या आर्थिक चिंतेने ते देखील ग्रासले आहेत, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा