Jitendra Awhad :अनामिक गरिबांची हाय मंत्री कोकाटेंना लागली अन् 30 वर्षांनी का असेना पण सत्याचा विजय झाला; जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका
Jitendra Awhad : माणिकराव आणि त्यांच्या भावाने गरीब लोकांच्या सदनिका हडपल्या. अत्यंत चीड आणणारा असा हा प्रकार आहे. अशी प्रतिक्रिया देत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर बोचरी टीका केली आहे.

Jitendra Awhad : मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी गुरुवारी नाशिक जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावत माणिकराव कोकाटे यांना अवघ्या दोन तासात जामीन देखील मंजूर झाला आहे. मात्र याच मुद्याला घेऊन विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडत मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
सदनिका गरजू गरीब लोकांसाठी होत्या. मात्र 1995 साली माणिकराव आणि त्यांच्या भावाने त्या हडपल्या. अत्यंत चीड आणणारा असा हा प्रकार आहे. पण शेवटी 30 वर्षांनी का असेना या खटल्याचा निकाल लागला आहे. ज्या अनामिक गरिबांचा हक्क कोकाटे यांनी हिसकावून घेतला त्यांची हाय त्यांना लागली आणि सत्याचा विजय झाला. अशी बोचरी टीका ही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
अतिरिक्त मुख्य न्यायालयीन दंडाधिकारी, नाशिक यांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेल्या निकालपत्रात म्हटलं आहे की, “आरोपी क्रमांक 1 (माणिक कोकाटे) स्वतः राजकारणी आणि वकील असूनसुद्धा आणि त्यांना परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला गेला आणि कायद्याची अवहेलना केली गेली. गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखावणारं हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली गेली.” (Court judgement, para. 37 on page 34)
"मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्ये केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही. कोणीही असलं तरी फसवणुकीचे गुन्हे माफ करणं योग्य नाही, हा संदेश देणं आवश्यक आहे." (Court judgement, para. 38 on page 34-35) हे माझे शब्द नाहीत. हे माननीय न्यायालयाचे शब्द आहेत. असे जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या समाजमाध्यमावर ट्विट करत टीका केली आहे.
नाशिक दंडाधिकारी न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्ष तुरुंगवास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावताना हे शब्द वापरलेत. कनिष्ठ न्यायालये यांच्यावर उच्च न्यायालयाचा वचक असतो. त्यामुळे ठोस पुरावे आणि तशीच ठोस कारणे असल्याशिवाय एखादं कनिष्ठ न्यायालय अरोपीबद्दल असे कठोर आणि स्पष्ट शब्द वापरत नाही. इथे माननीय न्यायालयाने ते वापरले यावरून या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात यावं. असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हे प्रकरण म्हणजे'मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं'
'मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं' म्हणजे काय असतं हे या प्रकरणात दिसून येते. सदनिका होत्या गरजू, गरीब लोकांसाठी. 1995 साली माणिकराव आणि त्यांच्या भावाने त्या हडपल्या. त्यावेळी ते किती गरीब होते? तर 1994 मध्ये त्यांनी बंदुकीच्या लायसन्ससाठी अर्ज केला. त्याचं कारणच हे होतं - 'माझ्याकडे 40 ते 50 कामगार काम करतात आणि त्यांना रोख रक्कम दर आठवड्याला द्यावी लागते. ही रक्कम हाताळण्यासाठी सुरक्षा म्हणून बंदुकीचा परवाना मिळावा.' किती ती गरिबी आणि किती ते दैन्य! ज्याच्याकडे 40 ते 50 कामगार काम करतात अशी गरिबी सर्वांना मिळो. पुढच्याच वर्षी अल्प उत्पन्न गटातून त्यांनी सदनिका बळकावल्या. अत्यंत चीड आणणारा असा हा प्रकार आहे. पण शेवटी 30 वर्षांनी का असेना या खटल्याचा निकाल लागला आहे. ज्या अनामिक गरिबांचा हक्क कोकाटे यांनी हिसकावून घेतला त्यांची हाय त्यांना लागली आणि सत्याचा विजय झाला. अशी बोचरी टीका ही जितेंद्र आव्हाड यांनी केली.
माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यायला हवा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 22, 2025
अतिरिक्त मुख्य न्यायालयीन दंडाधिकारी, नाशिक यांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेल्या निकालपत्रात म्हटलं आहे -
“आरोपी क्रमांक 1(माणिक कोकाटे) स्वतः राजकारणी आणि वकील असूनसुद्धा आणि त्यांना परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला गेला…
त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही अपेक्षा धरणं हा मोठा विनोदच- जितेंद्र आव्हाड
जे माझे शेतकरी बांधव आणि भगिनी दिवसरात्र शेतात राबून कष्टाची भाकरी खातात, त्यांची तुलना काही दिवसांपूर्वी या कोकाटेंनी भिकाऱ्यांशी केली. व्वा रे न्याय! म्हणजे कष्टाची भाकरी खाणारे भिकारी आणि शेतकऱ्यांसारख्या दुर्बल घटकांच्या नावावर सदनिका लाटणारे हे गरीब! त्यामुळे अशा गेंड्याच्या कातडीच्या माणसाकडून राजकीय आणि सामाजिक नैतिकतेची अपेक्षा करून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा धरणं हा मोठा विनोदच आहे. नैतिकता कशाशी खातात हे कोकट्यांना काय माहिती असणार? त्यामुळे लोकशाहीचा एक खांब असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षांनी - राहुल नार्वेकर यांनी - ताबडतोब कोकाटेंचं सदस्यत्व रद्द करावं अशी आमची मागणी आहे. माझी अजित पवारांना सुद्धा हात जोडून कळकळीची विनंती आहे की त्यांनी अशा भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालणं थांबवावं. आज वाल्मीक कराड प्रकरणात काय घडतय हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय.असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
या देशाला आणि महाराष्ट्राला नैतिकता असलेल्या नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. अगदी लाल बहादूर शास्त्रींपासून अलीकडच्या काळातील विलासराव देशमुख यांच्या पर्यंतच्या नेत्यांनी लोक भावनेचा आदर करत आपल्या पदाचे राजीनामे दिले. आर. आर. आबा यांच्याकडून बोलण्यात चूक झाली, तर लोकभावनेचा आदर करत पवार साहेबांनी त्यांच्याकडून गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला, हा इतिहासही याच महाराष्ट्राने पाहिला आहे. दुसरीकडे कुलदीप सिंग सेंगर, स्वामी चिन्मयानंद, गोपाल कांडा, येडियुरप्पा, मुकुल रॉय अशा गंभीर गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची भाजपची परंपरा आहे. लोकशाहीत जनता सार्वभौम असते. त्या जनतेच्या पोटावर पाय देऊन तुम्ही त्यांच्या सदनिका लाटता आणि आता आरोप सिद्ध झाल्यानंतरही तुम्हाला खुर्ची सोडवत नाही. सत्तेसाठी महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या थराला गेलंय याचा विचार आपण सर्वांनीच केला पाहिजे. असेही आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हे ही वाचा