ट्रेंडिंग
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
शासनाची भूमिका स्पष्ट आहे, शक्तिपीठ महामार्ग हा रस्ता करायचा आहे, मात्र लादायचा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
मुंबई : महाराष्ट्रातील नागपूर ते रत्नागिरी म्हणजेच विदर्भ ते कोकण जोडणारा शक्तिपीठ महामार्ग सध्या सरकारच्या अजेंड्यावर आहे. मात्र, सोलापूर आणि सांगलीतील काही शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला असून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनास विरोधी आमदारांनी भेट देऊन त्यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर, विधिमंडळ सभागृहात देखील या महामार्गसंदर्भाने चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार बंटी पाटील (Satej Patil), आमदार जयंत पाटील यांनी यासंदर्भाने शेतकऱ्यांची बाजू मांडत विरोध दर्शवल्याचे पाहायला मिळाले. आम्ही शक्तिपीठ महामार्ग आंदोलनाला आता जाऊन भेट दिली, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मार्ग होऊ देणार नाही अशी घोषणा केली. त्यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांनी केली आहे. विरोधकांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील शक्तिपीठ महामार्गासंदर्भाने भूमिका स्पष्ट केली.
शासनाची भूमिका स्पष्ट आहे, शक्तिपीठ महामार्ग हा रस्ता करायचा आहे, मात्र लादायचा नाही. बंटी पाटील आणि मुश्रीफ यांच्यासोबत कोल्हापूर एअरपोर्टला शेतकरी प्रतीक्षा करत होते, तेव्हा शेतकरी या मार्गाला विरोध करत नसून सह्याचं निवेदन त्यांनी दिलं. शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याच्या 5 जिल्ह्याचं चित्र बदलणारा आहे. शेतकऱ्यांना हा मार्ग हवा आहे, हा अट्टाहास नाही. समृद्धी महामार्गाने 12 जिल्ह्यातील जीवन बदललं, तसं या महार्गाने देखील जीवन बदलणार आहे. आज जसा मोर्चा आला, त्याच्या तिप्पट कार्यक्रम हा मार्ग व्हावा यासाठी होणार आहे. ज्या गावांमध्य सभा झाल्या, त्या गावात शेतकऱ्यांनी पैसे दिले आहेत. शेतकऱ्यांना जमिनीच्या पाचपट भाव दिला आहे. त्यामध्ये विरोधकांनी देखील मदत करावी, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवावं
मुख्यमंत्री यांनी स्पष्ट बाजू मांडली आहे. शक्तिपीठ हा महामार्ग नागपूर ते रत्नागिरीला जोडू शकतो, पण तो रस्ता आधीच आहे. सोलापूरवाल्यांनी, सांगोल्याच्या लोकांनी रस्ता दिला आहे. थोडा सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे, आज महाराष्ट्रामधील शेतकरी तिथे जमले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्यांना भेटीसाठी बोलावलं पाहिजे, असेही सतेज पाटील यांनी म्हटले. तसेच, ज्यांनी परवानगी दिली असं तुम्ही बोलत आहात, पण तेचं पहिले विरोध करायचे. त्यामुळे, याचा फेरविचार करावा, अशी मागणीही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सभागृहातच करुन दिली.
मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण
रस्ते विकास केल्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे. विरोधकांच म्हणणं आहे आपण समजून घेऊयात, तुम्ही माझ म्हणणं समजावून घ्या. शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या विकासासाठी महत्वाचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, ग्रीनफिल्ड रस्ता आपण केला, वाशीम सर्वात दुर्लक्षित भाग होता. आता तो सगळ्यात महत्वाचा भाग झाला आहे. नवीन ग्रीनफिल्डमुळे जास्तीत जास्त भाग जोडले जातात. समृद्धी, शक्तिपीठ आणि कोकण महामार्ग आपण बनवणार आहोत. या तीन रस्त्यांसाठी विचार करून जाळ तयार केलं आहे. महाराष्ट्रच्या हितासाठी हा रस्ता काढला जात आहे, असे उत्तरादाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले.