मला पाडण्यासाठी भाजपनेच प्रयत्न केले, आता तडजोड नाही; महायुतीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यानं रणशिंग फुंकलं
विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला भाजप व काँग्रेसकडून मदत केली गेली, निवडणुकीत पैसे पुरवले गेले.

गडचिरोली : विदर्भातील आदिवासी समाजाचे नेते आणि अजित पवारांचे (Ajit pawar) खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या धर्मराव बाबा अत्राम यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. मला यंदाच्या विधानसभा निवणुकीत पाडण्यासाठी भाजपने (BJP) प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोटच माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. नागपूर (nagpur) येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता आपण ताकद दाखवून देऊ असे म्हणत त्यांनी एकप्रकारे एकला चलो रे चे संकेत दिले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर धर्मराव बाबा आत्राम हे आमदार बनले, पण त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यापूर्वीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.
विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला भाजप व काँग्रेसकडून मदत केली गेली, निवडणुकीत पैसे पुरवले गेले. मात्र, तरी मी निवडून आलो असे आत्राम यांनी म्हटले. तसेच, आता स्थानिक स्वराज्य स्थंस्थेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाकडे जागेची भीक मागायची नाही. कोणाच्या कुबड्या घेऊन चालायचे नाही, गडचिरोली जिल्ह्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. मी कोणाचे ऐकणार पण नाही. पक्ष आमच्यासोबत असेल, गडचिरोलीत स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत सत्ता आणली जाईल, अशी भूमिका धर्माबाबा आत्राम यांनी मांडली. त्यामुळे, महायुतीत दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.
वडिलांकडून लेकीचा पराभव
विदर्भातील अहेरी मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यात विधानसभेची लढाई झाली. त्यामुळे, या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.धर्मरावबाबांच्या कन्येनं बंड करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकिटही मिळवलं होतं. मात्र, या निवडणुकीत वडिलांकडून लेकीचा पराभव झाला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे दिवाळीपूर्वीच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून महायुती एकत्र लढणार असल्याचे त्यांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकत्रित निवडणुका लढवण्याचं सांगितलं जात असलं तरी स्थानिक पातळीवर नेते मंडळी वेगळा निर्णय घेत आहे. त्याचाच एक भाग आज गडचिरोलीसंदर्भात धर्माराव बाबा आत्राम यांच्या भाषणावरुन दिसून आला. त्यामुळे, खरंच महायुती एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार की वेगळा निर्णय घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.
हेही वाचा
ही "चीप पब्लिसिटी" म्हणत कोर्टाने जनहित याचिका करणाऱ्याला झापलं; 7 हजारांचा दंडही ठोठवला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
