गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री कोणीच नाही; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या 'बॉर्डर'वर
आपण महाराष्ट्राच्या पहिल्या पॉईंटवर आलो आहोत, अगदी आपल्या नजरेत दिसेल एवढ्याजवळ छत्तीसगड आहे. कवंडेच्या पोलीस आऊटपोस्टमुळे या भागातील सिक्युरिटीचा खूप मोठा बॅकलॉग भरून निघाला आहे.

गडचिरोली : महाराष्ट्रातील नक्षल प्रभावी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वीकारले आहे. गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला मुख्यमंत्री दुसरा कोणीच नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात आपण स्वत: शेवटच्या टोकापर्यंत दौरे केल्याचं एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच, लवकरच गडचिरोलीमधून माओवाद संपुष्टात आणू असा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गडचिरोलीत 13 आत्मसमर्पित नक्षलवादी (Naxal) युवक-युवतींचा सामूदायिक विवाहसोहळा संपन्न होत आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस हे नवजोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी लग्नसोहळ्याला उपस्थित राहत आहेत. तत्पूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन पाहाणी केली.
आपण महाराष्ट्राच्या पहिल्या पॉईंटवर आलो आहोत, अगदी आपल्या नजरेत दिसेल एवढ्याजवळ छत्तीसगड आहे. कवंडेच्या पोलीस आऊटपोस्टमुळे या भागातील सिक्युरिटीचा खूप मोठा बॅकलॉग भरून निघाला आहे. हा भाग आजवर सर्व प्रकाराने अनकनेक्टेड होता. मात्र, आता पोलीस इथं आल्यानंतर शासनाच्या सर्व योजना, त्यांचे लाभ लोकांना मिळतील. शासनावरील लोकांचा विश्वास वाढेल आणि संपूर्ण भाग पोलिसांच्या आणि शासनाच्या डॉमिनन्स खाली आला आहे. आता माओवाद्यांना इथे कुठलेही ऑपरेशन्स राबवता येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला.
माझ्या एवढं गडचिरोलीत फिरणारा दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कोणीही नाही, या ठिकाणी विपरीत परिस्थितीत आपले सिक्युरिटी फॉर्सेस चांगलं काम करत आहेत. या सुरक्षा यंत्रणांचा मनोबल वाढवे म्हणून मी अशा आऊटपोस्टवर दुर्गम भागात जात असतो. लवकरच गडचिरोलीमधून माओवाद पूर्णपणे संपुष्टात आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. आजवर गडचिरोलीचा विकास आणि विकासाची क्षमता नेत्यांच्या भाषणामध्ये असायची. मात्र, 2014 नंतर आम्ही प्रत्यक्ष आणि गडचिरोलीत बदल घडवून आणले. मात्र, गडचिरोलीत औद्योगिक विकास करत असताना इथले जल, जंगल आणि जमीन वाचवून आपल्याला विकास करायचा आहे. गडचिरोलीचा नैसर्गिक स्वभाव आपण बदलणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी स्पष्ट केले.
पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा लग्नसोहळा
गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा लग्नसोहळा संपन्न होत आहे. जवळपास 13 आत्मसमर्पित नक्षल युवक युवती या विवाह सोहळ्यातून लग्न बंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी गडचिरोली पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे पोलीस मुख्यालय परिसरातून वर-वधुंची वाजत जागत वरात काढण्यात आली. या वरातीत पोलीस कर्मचारी वऱ्हाडी बनवून सहभागी झाले होते. विवाह बंधनात अडकणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षली गिरीधरसह नक्षल युवक-युवतींनी या लग्न सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.