शरद पवार म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, भुजबळ म्हणतात, लवकरात लवकर मनोमिलन व्हावं!
Chhagan Bhujbal on Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या शरद पवारांच्या वक्तव्यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chhagan Bhujbal on Sharad Pawar : "भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. दोन्ही राष्ट्रवादींनी भविष्यात एकत्र यायचं की नाही? हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवायचं आहे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय. आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत. आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांघले गेलेले आहेत", असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं. यावर माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ काय काय म्हणाले?
छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवलाय. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावं अशीच इच्छा मी व्यक्त करतो. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे, पण अजित पवार हे पवारसाहेबांच्या घरातच वाढलेत, त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज आहे असं वाटत नाही.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मी काही यावर अधिक बोलू शकत नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत त्यावर भाष्य करणे उचित नाही. वरिष्ठ निर्णय घेतील त्यांच्या सोबत आम्ही राहू. मी त्याच्यावर मत व्यक्त करणे माझ्या स्तरावर उचित होणार नाही.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील आमदार आग्रही
राष्ट्रवादी सोबत आपण जायला हवं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सोलापूर जिल्ह्यातील आमदार आग्रही आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील आमदार अभिजीत पाटील, नारायण पाटील, उत्तमराव जाणकर, राजू खरे यांनी शरद पवारांना भेटून आपण राष्ट्रवादीत गेल पाहिजे अशी विनंती केली होती. विरोधी पक्षात असताना मोठ्या प्रमाणात निधीच्या अडचणी येत असल्याची आमदारांची भावना आहे. सदर आमदारांकडून वारंवार अजित पवारांची भेट घेण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. आगामी काळात अजित पवारांसोबत गेल्यास मतदारसंघ टिकवता येईल, लोकांची कामे करता येतील अशी आमदारांची भावना असल्याचं बोललं जातंय. जर आत्ताच आपण प्रवेश केला नाही तर आगामी काळात आपले मतदारसंघातील विरोधक सत्ताधारी पक्षासोबत जातील आणि पुन्हा निवडून येण अडचणीच होऊ शकेल अशी आमदारांची मानसिकता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
