महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना...
Aditi Tatkare and Bharat Gogawale : आदिती तटकरेंना झेंडावंदनाची संधी मिळताच भरत गोगावले समर्थक चांगलेच भडकले आहेत.
Aditi Tatkare and Bharat Gogawale : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र दिनी होणाऱ्या मुख्य झेंडावंदनाचा मान पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना दिल्याने शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) नाराजीचा सूर पसरला आहे. आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने रायगडमधील मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) समर्थकांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार, नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती. मात्र, या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरून टायर जाळत रास्ता रोको आंदोलन केले. त्याचप्रमाणे, नाशिकमध्येही मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या 24 तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत घेतलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. महायुतीत अजूनही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असून महाराष्ट्र दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावरून रायगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
ट्रेंडिंग
दोघांनाही समान संधी देणे आवश्यक : सुरेश महाडिक
आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने रायगडचे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री पदाचा निर्णय काय होईल , कधी होईल तेंव्हा होईल पण यावेळी ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांनाच मिळाला पाहिजे अशी मागणी रायगडचे शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक यांनी केलीय. दोघांकडेही मंत्रीपद असताना हा न्याय दोघांना समान देणे गरजेचे असून अस न झाल्यास आमचा राग अनावर होईल आणि याला सर्वस्व जबाबदार सुनील तटकरे असतील, असा टोला त्यांनी खासदार सुनिल तटकरे यांना नाव न घेता लगावला आहे.
पालकमंत्री भरत शेठच व्हावे संपूर्ण रायगडची इच्छा : महेंद्र दळवी
तर आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे की, मध्यंतरी आदित्य तटकरे यांच्या पदाला स्थगिती दिली होती. आम्ही उठाव केला होता त्यामुळे स्थगिती दिली. भरत शेठच्या रूपाने पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे. त्यांना ध्वजारोहणाचा मान मिळणं हे योग्य नाही. कुठेतरी आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही उद्या रायगड कार्यकारिणीची बैठक लावली आहे. माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, एकदाचा पालकमंत्रीपदाचा निर्णय घ्या. रायगडवर अन्याय का? उद्या कार्यकारिणीची बैठक घेऊन एक तारखेला याचा नक्कीच विरोध करणार आहोत. जनतेने आम्हाला जनाधार दिला आहे. संपूर्ण रायगडची इच्छा आहे की, पालकमंत्री भरत शेठच व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि रायगडच्या लोकांची भूमिका त्यांच्यापुढे मांडणार आहे. मला विश्वास आहे की, वरिष्ठ पातळीवरून भरत गोगावले यांना पालकमंत्री घोषित केले जाईल. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला आमचा विरोध राहणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा
दुष्काळात तेरावा... बीडमध्ये आता पाण्याची चोरी, वृद्ध दाम्पत्याच्या विहिरीतील अडीच परस पाणी पळवलं