Manikrao Kokate : राजकीय वैरातून माझ्यावर केस, हायकोर्टात जाणार; कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 1995 ते 1997 च्या काळात सरकारच्या 10 टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर सुनावण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु होती. आज गुरुवारी (दि. 20) न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांनी शिक्षा ठोठावली आहे. आता यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे म्हणाले की, ही राजकीय केस होती. गेल्या 28 वर्षांपूर्वी ही केस रजिस्टर झाली आहे. त्यावेळेस दिघोळे साहेब हे राज्यमंत्री होते. माझा आणि त्यांचा राजकीय वैर होता. त्या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर केस दाखल केली होती. त्याचा निकाल 30 वर्षानंतर आज लागलेला आहे. न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे. निकालपत्र 40 पानांचं आहे. ते मी अजून वाचलेले नाही. मी कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे. राजकीय दृष्ट्या देशात अशा प्रकारचे अनेक निकाल लागले आहे. मी हाय कोर्टात जाणार आहे. जसा निकाल सुनावण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. तसाच आम्हाला देखील एक नागरिक म्हणून न्याय मागण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
माणिकराव कोकाटेंकडून जामीन अर्ज दाखल
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून या अर्जावर सुनावणी सुरू आहे. थोड्याच वेळात जामिनाबाबत निर्णय होणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
1995 ते 97 च्या दरम्यानचं हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न हे कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांच्या बाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाची शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि दंडाची शिक्षा ठोठावली.
आणखी वाचा
Manikrao kokate: माणिकराव कोकाटेंना 28 वर्षांनी ते 'पाप' फेडावं लागलं, एक नव्हे तर चार घरं लाटली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

