तरुण शेतकऱ्याने जीवन संपवलं, धक्क्याने वडिलांचा मृत्यू, दोघांच्या मृत्यूने आईलाही हृदयविकाराचा झटका!
वडील भीमराव बेदरे यांना साडेतीन एकर कोरडवाहू शेती, या शेतीवर भारतीय स्टेट बँकेचे कर्ज. त्यातच, बेदरे यांना आजाराने ग्रासल्याने ते अंथरुणाला खिळले होते.
नांदेड : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यात घडलीय. मात्र, तरुण मुलाच्या आत्महत्येच्या धक्याने वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यातच आईलाही हृदयविकाराचा झटका आल्याचा ह्रदयद्रावक प्रकार घडल्याने गावात शोककळा पसरली आहे. अवघ्या 27 वर्षाच्या युवा शेतकऱ्याने (Farmer) कर्ज आणि नापिकीला, आर्थिक संकटाला कंटाळून मृत्युला कवटाळले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे ही घटना घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पीडित कुटुंबीयांना आधार देत पुढाकार घेतला आहे. मात्र, ग्रामस्थ करुन करुन काय करणार आहेत, आता शासनानेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देऊ करावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वडील भीमराव बेदरे यांना साडेतीन एकर कोरडवाहू शेती, या शेतीवर भारतीय स्टेट बँकेचे कर्ज. त्यातच, बेदरे यांना आजाराने ग्रासल्याने ते अंथरुणाला खिळले होते. कुटुंबाची जबाबदारी घरातील कर्त्या मुलावर म्हणजेच राहुलवर आली. शेती आणि मिळेल ती मजुरी करुन राहुल आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत होता. पण, शेतीतील नापिकी आणि वडिलांचे आजारपणामुळे नैराश्याने त्यालाही ग्रासले. याच नैराश्यातून त्याने 10 जून रोजी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या तरुण मुलाच्या मृत्युच्या धक्याने वडिलांचाही दोन दिवसांत म्हणजेच 12 जून रोजी मृत्यू झाला. कुटुंबावर कोसलळेलं हे संकट आईच्याही काळजाचा ठोका चुकवणारं होतं. मुलगा आणि पतीच्या मृत्युच्या घटनेनंतर आई शोभाबाई यांना हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने सध्या त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे, पण घरात दु:खाचा डोंगर असताना त्याही रुग्णालयात मृ्त्युशी झुंज देत होत्या.
ट्रेंडिंग
शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर कायमचा तोडगा काढावा
बेदरे कुटुंबीय राहात असलेल्या सावरगाव परिसरातील सर्व शेती कोरडवाहू आहे. सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे इथला शेतकरी नेहमीच अडचणीत असतो. त्यातूनच बेदरे कुटुंबासोबत ही दुर्दैवी घटना घडली. सरकारने बेदरे कुटुंबाला मदत करावी, तसेच या परिसरातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी जवळ असलेल्या धोंड प्रकल्पातून पाण्याची सोय करावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्याची परिस्थिती अधोरेखित करणारी ही घटना म्हणावी लागेल. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना या परिस्थितून बाहेर काढण्यासाठी केवळ घोषणा करण्याऐवजी ठोस पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
हेही वाचा
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश; उड्डाणपूर्व बंधने