विश्व संवाद केंद्राकडून मुंबईचे देवर्षी नारद पुरस्कार जाहीर; एबीपी माझाचे संदीप रामदासींसह 11 जणांचा सन्मान
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने समीर कर्वे (प्रिंट मीडिया), संदीप रामदासी (इलेक्ट्रॉनिक मीडिया) व शैलेश गायकवाड (सोशल मीडिया) यांचा सन्मान होणार आहे.
मुंबई : विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे (mumbai) प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या पत्रकारांचा दर वर्षी ’देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. या पुरस्काराचे यंदाचे 25वे वर्ष आहे. त्या निमित्ताने प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया अशा प्रसारमाध्यमांच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या 11 जणांचा सन्मान केला जाणार आहे. 203 वर्षे जुन्या असलेल्या मुंबई समाचारचा पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल तसेच गेली 77 वर्षे कार्यरत असलेल्या हिंदुस्थान समाचार या बहुभाषिक न्यूज एजन्सीलाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने समीर कर्वे (प्रिंट मीडिया), संदीप रामदासी (इलेक्ट्रॉनिक मीडिया) व शैलेश गायकवाड (सोशल मीडिया) यांचा सन्मान होणार आहे. तर पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी (कविता) मयेकर यांचा सन्मान होणार आहे. या व्यतिरिक्त, सोशल मीडिया पुरस्कारांमध्ये यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक, इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर व अमोल जामदारे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले याचा सन्मान होणार आहे. हा पुरस्कार सोहळा शनिवार 14 जून 2025 रोजी एनएसई बिल्डिंग, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.) इथे होणार असून, त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका तर विशेष अतिथी म्हणून टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर व टाइम्स नाऊ नवभारतच्या एडिटर-इन-चीफ नाविका कुमार उपस्थित राहणार आहेत. रा.स्व.संघाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ मुळे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असतील.
ट्रेंडिंग
दरम्यान, संदीप रामदासी हे दोन दशकांहून अधिक काळ पत्रिकारितेत कार्यरत असून टेलिव्हिजन मीडियात एबीपी माझा या वृत्तवाहिनीतून पत्रकारितेत आपलं योगदान देत आहेत.