रस्ते आणि नालेसफाईची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा, मंत्री गोयल यांचे महापालिकेला निर्देश, म्हणाले अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करणार
रस्त्यांची आणि नालेसफाईची सर्व कामे कोणत्याही स्वरूपात 31 मे पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य पीयूष गोयल यांनी दिली आहे.
Minister Piyush Goyal : येत्या पावसाळ्यात उत्तर मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या सुरु असलेली उत्तर मुंबईतील रस्त्यांची आणि नालेसफाईची सर्व कामे कोणत्याही स्वरूपात 31 मे पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी दिली. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, अशीही सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी सूचना दिल्या आहेत.
उत्तर मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पीयूष गोयल यांनी महापालिका, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, पोलिस अशा सर्वच विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चौथी आढावा बैठक शनिवारी महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयात घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व कामांच्या प्रगतीची माहिती दिली. पोयसर आणि दहिसर नद्यांच्या पात्रांच्या रुंदीकरणसह नालेसफाईचे काम 25 टक्के पुर्ण झाले असून त्यासोबत उत्तर मुंबईतील चार विभाग कार्यालयांच्या अंतर्गत सुरू असलेली 212 रस्त्यांची कामे 31 मे पर्यंत पुर्ण करण्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी कबूल केल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले.
मालाड येथील मालवणी परिसरात अतिक्रमण करण्यासाठी भूमाफिया अहोरात्र येथे ट्रकद्वारे भरणी करत आहेत. या ट्रकविरोधात आणि अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. या कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्यात यावे तसेच अंबुजवाडी आणि आक्सा येथे दोन नवी पोलिस ठाणी उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. उत्तर मुंबईत अकरा तलाव असून त्यात भरणी करण्यात आल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. याची दखल घेत पुढील दोन वर्षांत त्यांचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.
ट्रेंडिंग
दहिसर, बोरीवली, कांदिवली आणि मालाड या चार रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार
दहिसर, बोरीवली, कांदिवली आणि मालाड या चार रेल्वे स्थानकांचा अमृत स्थानके म्हणून विकास करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. सर्व स्थानकांबाहेरील फेरीवाले आणि अतिक्रमणे हटवून प्रवाशी आणि पाद चाऱ्यांना दिलासा देण्यात येईल. बोरीवली स्थानकाबाहेर हे काम सुरू झाल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले.
कांदिवली पश्चिम येथेही एक हजार बेडचे हॉस्पिटल उभारण्यात येणार
महापालिकेच्या भगवती हॉस्पिटलच्या पुनर्विकासाचे कामही ३१ मे पर्यंत पूर्णत्वास येणार असून कोणत्याही स्थितीत त्याचे खासगीकरण केले जाणार नाही तर महापालिका अथवा धर्मादाय संस्थेमार्फत ते ना नफा ना तोटा तत्वावर चालवले जाईल आणि त्यात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरिबांना सेवा देण्याची दक्षता घेतली जाईल, असेही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले. मागाठाणे येथे एक हजार बेडच्या हॉस्पिटलचे काम आधीच सुरू झाले असून कांदिवली पश्चिम येथेही एक हजार बेडचे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. गोराई येथेही नव्या हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी आयुष्मान योजनेअंतर्गत सेवा पुरवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या शैक्षणिक वर्षांत महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्रचिकित्सा केली जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांची दृष्टी अधू असेल त्यांना सीएसआर योजनांतर्गत मोफत चष्मे पुरवले जातील, अशी घोषणा त्यांनी केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेल्या मिनी ट्रेनबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार वर्षभरापूर्वी सुरू झालेले मिनी ट्रेनचे काम पुर्ण होऊन दोन महिन्यात मिनी ट्रेन धावू लागेल, अशी माहिती गोयल यांनी दिली.
उत्तर मुंबईतील सर्व स्मशानभूमींची तातडीने पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचा अहवाल येताच त्या स्मशानभूमींची डागडुजी, नूतननीकरण करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व स्मशान भूमींमध्ये विद्युत दहिनीची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत रस्तेजोडणी, पूल, सागरी महामार्ग अशा प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. इमारतींचा पुनर्विकास, उद्याने आणि पर्यटन याबाबत पुढील बैठकीत विस्ताराने चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.