मराठवाड्यात पाणीटंचाईला सुरुवात; विभागात 42.90% जलसाठा, नाशिक नगरच्या धरणांमध्ये काय स्थिती?
यंदा पुण्याच्या धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा असून 39.55 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा मराठवाड्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याहूनही कमी असल्याने चिंता व्यक्त केली जातेय.

Dam Water Storage: राज्यात तापमानाचा उच्चांक प्रचंड वाढला आहे. बहुतांश ठिकाणी तापमान 43-45 अंश सेल्सियस पर्यंत जात आहे. उष्णतेच्या चटक्यासह आता राज्याला पाणीटंचाईची चाहुलही लागली आहे. राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये आता अर्ध्याहूनही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यात यंदा पुण्याच्या धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा असून 39.55 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा मराठवाड्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याहूनही कमी असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. दरम्यान, मराठवाड्यात आता 42.90 टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, धरणातील पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन होत असून अनेक धरणांचा पाणीसाठा एप्रिल मध्यापर्यंत मायनसमध्ये जाईल असं सांगण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा चांगला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी सोडण्यात येणारी आवर्तने, पिण्याचे पाणी, औष्णीक वीज केंद्रे आणि औद्योगिक कारणांसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांची स्थिती काय आहे? (Dam water)
राज्याचा सरासरी पाणीसाठा किती?
राज्याच्या एकूण सहा महसूल विभागांचा म्हणजेच नागपूर, अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकणातील एकूण धरणांमध्ये आज (8 एप्रिल) 43.67 टक्के सरासरी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून 25 हजार 397 दलघमी पाणीसाठा उरलाय. विभागनिहाय कुठे किती?
पुणे विभाग: 39.55%
मराठवाडा: 42.90%
नाशिक: 45.73%
कोकण: 51.13%
नागपूर: 43.52%
अमरावती: 51.43%
मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या 42.90% पाणीसाठा शिल्लक आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात आज उपलब्ध पाणीसाठा 49.86% आला असून एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणीसाठा 50 टक्क्यांच्या खाली आल्याने मराठवाड्यात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.बीडचे माजलगाव धरण 38.13 टक्के तर मांजरा 42.37% जलसाठा शिल्लक राहिला आहे. हिंगोलीच्या सिद्धेश्वर 61.10% आणि येलदरी धरणात 59.35% पाणी शिल्लक असून नांदेड विष्णूपुरी धरणात 39.87% पाणी आहे. धाराशिवला उजनीतून पाणीपुरवठा होतो. सध्या उजनीत 19.31% पाणीसाठा शिल्लक आहे. उनजीचा पाणीसाठा एप्रील मध्यापर्यत मायनसमध्ये जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भीमा नदीत उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने सोलापूर शहरासह नदी काठच्या गावांमधील पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटणार आहे. मराठवाड्यात पाणीटंचाई म्हणजे नाशिक नगरच्या धरणातून पाण्याची आवर्तनं होण्याची शक्यता असते. त्यामुळे नाशिक आणि नगरच्या धरणसाठ्यात किती पाणीसाठा शिल्लक आहे? नाशिकच्या एकूण धरणांमध्ये सध्या 45.73% पाणीसाठा शिल्लक आहे. दारणामध्ये सध्या 44.56% पाणी शिल्लक असून गंगापूर 61.56%, गिरणा 31.15%, तर अहिल्यानगरचे भंडारदरा 65.57%, मुळा 48.99, निळवंडे 38.19% पाणी शिल्लक आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

