ट्रेंडिंग
पुण्यात भिंत ढासळून तब्बल 18,000 कोंबडयांचा मृत्यू, पावसाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचं नुकसान
Pune: शेडमध्ये जवळपास 22 ते 23 हजार पक्षी होते मात्र भिंत ढासळल्याने यापैकी जवळपास 18 हजार पक्षांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला जातोय.
Pune Rain Update: राज्यात मुंबई, पुणे, सोलापूरसह बहुतांश भागात मानसून दाखल झालाय. राज्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. भिंती खचल्या आहेत. रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान पुण्यातील दौंडमध्ये एका पोल्ट्री फार्मची भिंत ढासळून तब्बल 18000 कोंबड्यांच्या जागीच मृत्यू झाल्या असल्याचे समोर येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दौंड, इंदापूर, बारामतीसह पुण्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे.
दौंड तालुक्यातील हातवळण गावात शुभम गोगावले यांचा कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे. यांच्या शेडमध्ये जवळपास 22 ते 23 हजार पक्षी होते मात्र भिंत ढासळल्याने यापैकी जवळपास 18 हजार पक्षांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला जातोय. आतापर्यंत या शेडमधून 9 ते 10 हजार मृत पक्षी बाहेर काढण्यात आले आहेत. आणखीही मृत पक्षी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान
अवघ्या वर्षभरापूर्वी शुभम गोगावले यांनी कर्ज घेऊन पोल्ट्री शेड बांधलं होतं. या शेडमध्ये जवळपास 22 ते 23 हजार पक्षांपैकी तब्बल 18000 कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील शुभम गोगावले या पोल्ट्री व्यवसायिकाचे गेल्या दोन दिवसात झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. जोराच्या सुटलेल्या वादळाने पोल्ट्री फार्म च्या शेड वरील पत्रे उडले असून भिंतही कोसळली. त्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. पोल्ट्री फार्म ची भिंत ढासळल्याने 18000 कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यातून गोगावले यांचा तब्बल 80 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. आता सरकारने मदत करावी अशी मागणी शुभम गोगावले या शेतकऱ्याने केली आहे.
राज्यभरात पावसाचं थैमान
राज्यातील या परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना विविध यंत्रणांकडून अवगत करण्यात आले. राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. बारामतीत 25 घरांशी अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुंबईत 24 तासात 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.