महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या झळा! उजनी शुन्यावर, जलसाठ्यांची घसरगुंडी, कोणत्या धरणात किती पाणी राहिलंय? वाचा
Dam Water Storage: महाराष्ट्राच्या सहा महसूल विभागांपैकी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन विभागातील धरणांमध्ये आता 40 टक्क्यांहूनही कमी पाणी शिल्लक आहे.

Dam Water Storage: राज्यातील धरणसाठा आता 38.95 टक्क्यांवर आलाय. पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, विदर्भातील सर्व मोठ्या धरणांचा पाणीसाठा आता झपाट्यानं खाली घसरलाय. एकीकडे तापमानाच्या झळा आणि दुसरीकडे पाणीटंचाई अशा दुहेरी कात्रीत राज्यातील बहुतांश भागातील नागरिक सापडले आहेत. अकोल्यात पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावले जात आहेत. मराठवाड्यात 10-12 दिवसांनी एकदा नळाला पाणी येतानाचे चित्र पुन्हा सुरु झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या नियोजनावरून नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. राज्यभरात पाणीटंचाईचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. दरम्यान, धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे? पाहूया... (Maharashtra News)
राज्यात किती धरणसाठा शिल्लक?
महाराष्ट्राच्या सहा महसूल विभागांपैकी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन विभागातील धरणांमध्ये आता 40 टक्क्यांहूनही कमी पाणी शिल्लक आहे. पुणे विभागात राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काही टक्क्यांनी पाणीसाठा अधिक असला तरी काही प्रमुख धरणे एप्रीलमध्यावरच मायनसच्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. त्यामुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी याच सुमारास पाणीसाठा 33.62% एवढा होता. तो यंदा 38.95% एवढाच राहिलाय.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा
विभाग गतवर्षीचा जलसाठा यंदाचा जलसाठा
पुणे 29.51% 32.70%
छ. संभाजीनगर 17.06% 38.77%
नाशिक 37.41% 42.64%
कोकण 47.68% 48.41%
नागपूर 44.89% 39.27%
अमरावती 48.45% 48.96%
राज्यातील सर्वात कमी जलसाठा पुणे विभागात
राज्यात पुणे विभागातील लघु मध्यम आणि मोठ्या एकूण 720 धरणांमध्ये आता केवळ 32.70% पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरण 51.12 टक्क्यांवर भरले असून त्यात सध्या 28.58 दलघमी उपयुक्त पाण्यासाठी आहे. पानशेत धरणात 34.10% पाणीसाठा शिल्लक आहे. सांगलीतील वारणा धरण 40.56 टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. साताऱ्यातील कोयना ३७.२२ टक्क्यांवर आहे. तर सोलापूरमधील उजनी धरण आता शून्यावर पोहोचले आहे. कोल्हापुरातील दूधगंगा 26.48 टक्क्यांवर असून राधानगरी धरण 54 टक्क्यांवर आहे.
मराठवाड्यात काय स्थिती?
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सध्या 44.93% पाणीसाठा शिल्लक आहे. बीड मधील मांजरा धरण 35 टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे तर माजलगाव धरणात 20.40% पाणीसाठा शिल्लक आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर आणि येलदरी धरण 48.83% व 57.56% अनुक्रमे आहेत. नांदेडच्या विष्णुपुरी धरणात 33.42% पाणीसाठा आता शिल्लक आहे. धाराशिव चे सीना कोळेगाव धरण 6.4 टक्क्यांनी भरले आहे तर निम्न तेरणा 56 टक्क्यांवर आहे. परभणीच्या निम्न दुधनामध्ये 37.90% पाणीसाठा शिल्लक आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
