ट्रेंडिंग
माझा फोन आला तरी चुकीच्या कामाला नाही म्हणा, बावनकुळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना, पवारांचं कौतुक तर राऊतांना टोला
वाळू संदर्भात काहीजण अधिकाऱ्यांना माझं देखील नावं सांगतात. पण माझा फोन जरी आला तरी चुकीच्या कामाला नाही म्हणा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : वाळूमाफिया (sand mafia) रोखण्यासाठी आमच्या सरकारनं नवीन वाळू धोरण आणलं आहे. अनेक जणांचे मंत्र्यांशी वगैरे संबंध असतात. वाळू संदर्भात काहीजण तर अधिकाऱ्यांना माझं देखील नावं सांगतात. पण माझा फोन जरी आला तरी चुकीच्या कामाला नाही म्हणा अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले. पुढच्या 3 वर्षात वाळू माफिया आणि वाळू संदर्भातले सर्व महत्वाचे प्रश्न संपलेले असतील असंही ते म्हणाले.
भूमी अभिलेख खात्यातील लोकांना सूचना
भूमी अभिलेख खात्यातील लोकांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी तातडीने रुजू व्हावे. ते शासनाला कोणतीही सूचना न देता संपवार गेले आहेत. त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत, त्यांनी ड्युटीवर येऊन सांगावे. लोकांना वेठीस धरणे हे शासन मान्य करणार नाही असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आम्ही त्यांची कोणतीही मागणी अशी पूर्ण करणार नाही, त्यांना पगार देखील दिला जाणार नाही असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. अशा पद्धतीने कोणतीही गोष्ट न सांगता जर आंदोलन आणि युनियनबाजी करणार असतील तर हे मान्य नाही. तुमचा कुठलाही प्रश्न असेल सरकारपुढे मांडा, मंगळवारी येऊन मला भेटा पण यापद्धतीने वेठीस धरणे योग्य नाही असे ते म्हणाले. सरकार तुमचा प्रश्न सोडवायला तयार आहे, कोतवालापासून तलाठीपर्यंत सर्वांना न्याय दिला पाहिजे असे बावनकुळे म्हणाले. उजनी धरणाच्या खोलीकरणासंदर्भात देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. उजनी धरणात खोलीकरण करुन त्यातून निघणारी वाळू सरकारी कामना देण्याचा चर्चा झाली असल्याचे बावनकुले म्हणाले.
शरद पवारांचं कौतुक, राऊतांना टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले आहे. या मुद्यावर देखील बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षात कामं करणाऱ्या चांगल्या लोकांचं कौतुक देखील केलं पाहिजे हे संस्कार आहेत असं बावनकुळे म्हणाले. शरद पवार यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रमध्ये घालवलं आहे, त्यामध्ये चांगलं कामं केलं आहे.
संजय राऊत संस्कृती आणि संस्कार विसरलेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार असे बावनकुळे म्हणाले.
आदिवासी विभागाचे पैसे दुसरीकडे वळवण्यात आले नाहीत
आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असल्याचे बोलले जात आहे. यावर देखील बावनकुळे यांना प्रतिक्रिया दिली. अत्यंत फेक बातमी आहे. बातमीत तथ्य नाही असे बावनकुळे म्हणाले. काहीतरी व्हॉट्सपवर सरकार बद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी चालू आहे. आदिवासी समाज आणि मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या पैशांना कोणतेही सरकार कधीही हात लावत नाही हा पैसा रिझर्व पैसा असल्याचे ते म्हणाले. आदिवासी विभागाची जी टक्केवारी एकदा मंजूर झाली ती कोणालाही काढण्याची हिंमत नाही. लाडकी बहिण योजनेचं बजेट हेड वेगळ आहे. ते महिला व बालकल्याणकडे आहे असे बावनकुळे म्हणाले.
कुणीही समाजकल्याणचे पैसे आणि आदिवासी विभागाचे पैसे दुसरीकडे वळवण्यात आले नाहीत. त्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सरकारला बदनाम करण्यासाठी तयार केली गेलेली जाणीवपूर्वक बातमी व्हॉट्सॲपवर फिरत आहे.
राहुल गांधी वेडे झालेत
निवडणूक घेण्याचं अधिकार हे आयोगाला आहेत. आयोग जेव्हा निवडणूक घेईल तेव्हा सरकार म्हणून यंत्रणा तयार आहे. भाजप म्हणून देखील आम्ही सक्षमपणे तयार आहोत असे बावनकुळे म्हणाले. राहुल गांधी यांच्यावर देखील बावनकुळेंनी टीका केली. राहुल गांधी किती वेडे झालेत हे संपूर्ण देशाला माहिती आहे. ऑपरेशन सिंदूर सारख्या गोष्टीवर ते प्रश्नचिन्ह उभे करतात. महाराष्ट्रमध्ये त्यांनी सावरकरांचा अपमान केला, त्यावेळी कोर्टाने फटकारलं आहे. ते वेडे झालेत, त्यामुळे त्यांच्या नादाला तुम्ही लागू नका अशी टीका बावनकुले यांनी केलीय.
ज्याठिकाणी जुळणार नाही त्याठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुतीमध्येचं ळडवणार आहोत. पण ज्याठिकाणी जुळणार नाही त्याठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल, त्यानंतर पुन्हा एकत्रित येऊ असे बावनकुळे म्हणाले. महायुतीमध्ये प्रॉब्लेम आहे असा याचा अर्थ नाही असे बावनकुले म्हणाले. भाजप निवडणुकीत जिंकतो त्यातून काही शिकतो. लोकसभेत काही जागावर आम्ही शिकलो आणि चार महिन्यात आम्ही विधानसभा निवडणुकीत जिंकलो. जिंकणे हरणे या लढाईत न जाता आम्ही राज्यातील जनतेच्या कामाला लागलोय असे बावनकुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: