ट्रेंडिंग
सोलापुरात दूषित पाण्याने 2 मुलींचा मृत्यू, पालकमंत्री गोरेंनी घेतली कुटुंबीयांची भेट, राज्य सरकारकडून 5 लाखांची तर वैयक्तिक 1 लाखांची मदत
सोलापुरात दूषित पाण्याने मृत पावलेल्या मुलींच्या कुटुंबीयांची पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी भेट घेऊन सांत्वन केलं.
Jayakumar Gore : सोलापुरात दूषित पाण्याने मृत पावलेल्या मुलींच्या कुटुंबीयांची पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून वैयक्तित निधीतून मृत मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाखांची मदत करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी दिलेले मृत्यूचे कारण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खोडून काढले आहे.
डेंग्यूमुळे दोन्ही मुलींचा मृत्यू झाला नाही तर प्राथमिक माहितीनुसार दूषित पाण्यामुळेच मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे.
मनपा आयुक्तांचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खोडून काढला
मनपा आयुक्त सचिन ओम्बसे यांनी मुलींचा मृत्यू डेंग्यू सदृश्य तापाने झाल्याचा दावा केला होता. मात्र पालकमंत्री जयकुमार गोरेंनी हा दावा खोडून काढला आहे. दोन मुलींचा मृत्यू ही दुर्दैवी बाब असून तिसरी मुलगी सिरीयस आहे. त्यामुळं तिसऱ्या मुलीला गरज भासल्यास खासगी रुग्णालयात उपचार देणार आहे. आज मी मृत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना वैयक्तिक 1 लाखाची मदत केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केली आहे.
मी स्वतः पाहणी केली की गटाराच्या चेंबरमधून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जाते. पिण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी गेल्यानेच ही घटना झाली आहे. याबाबत चौकशीच्या सूचना मी दिल्या आहेत. या पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले असून घटना कशामुळं घडली याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. जी घटना घडली ती न लपवता त्याच्या मुळाशी जाऊन आपण निष्कर्ष काढला पाहिजे. बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार आहे. महापालिका प्रशासनासोबत मी आता बैठक घेतली आहे. त्यानंतर दोन कोटींचा निधी तात्काळ त्यांना जाहीर केला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये ड्रेनेजच्या चेंबर मधून पिण्याच्या पाण्याची लाईन गेल्यामुळे असे प्रकार घडले असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी सांगितली. त्यामुळे बाबू जगजीवन राम झोपडपट्टी तसेच शहरातील विविध भागात ड्रेनेजच्या चेंबर मधून पिण्याच्या पाण्याची लाईन काढून त्या दुसरीकडून वळवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डेंग्यूने दोन मुलींच्या मृत्यू झाला नाही, पाण्यातच दोष
झालेली घटना का झाली हे लपवायचं कोणताही कारण नाही. ते न लपवता आपण निष्कर्षापर्यंत पोहोचलो तरच उपाययोजना करता येतील. त्या भागामध्ये डेंग्यूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्या भागातील पाणी दूषित असूही शकतं मात्र त्याचे रिपोर्ट अधिकृत आपल्याकडे आलेले नाहीत. परंतू डेंग्यूने मृत्यू झालेला नाही. प्राथमिक दृष्ट्या पाण्यातच दोष असावा असे दिसत आहे. मात्र दोन दिवसात निष्कर्ष येईल. बैठकीत आम्ही चर्चा केली उपाययोजनांच्या दरम्यान कोणीही आडवा आला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. काल मी जेल प्रशासन आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी करता येईल याबाबत उपाययोजना लवकरच करणार असल्याचे गोरे म्हणाले.