जल जीवन मिशन नावाला, कोरड घशाला..निलंग्यात हंडे कळशा घेऊन पाण्यासाठी रांगा, नागरिकांचा संताप
Latur Water Crisis: गेल्या चार वर्षांपासून काम रखडल्याने गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावकऱ्यांच्या नशिबी दोन किलोमीटरची पायपीट आली आहे.

Latur: राज्यभरात आता पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. (Water Crisis) लातूर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे पंधराशे कोटी रुपयेचे कामे जिल्हाभरात करण्यात आली आहेत.निलंगा तालुक्यातील उमरगा हडगा येथे 88 लाख रुपयांची पेयजल योजना मंजूर होऊन चार वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप 50 टक्के सुद्धा काम पूर्ण झाले नाही.. याचा परिणाम थेट गावावर झाला आहे.. तहान भागवण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट त्यांच्या नशिबी आली आहे.. (Jaljeevan Mission)
जलस्त्रोत आटू लागले, जलजीवन मीशनची कामं अर्ध्यावरच
सुमारे 3000 लोकसंख्या असलेल्या या गावासाठी चार किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणीपुरवठ्याची योजना मंजूर करण्यात आली होती. विहिरीत भरपूर पाणी असूनही काम 50 टक्क्यांवरच अडकले आहे. यामुळे उन्हाळ्यात टंचाई अधिकच गंभीर बनली आहे. गावात पूर्वीपासून असलेली सरकारी विहीर व सहा बोरवेल हेच एकमेव पाणीपुरवठ्याचे स्रोत असून, तापमान वाढल्यावर हे स्त्रोत आटू लागतात. त्यामुळे गावात पाण्याची कमतरता भासते ..परिणामी गावातील लाभार्थ्यांना पाण्यासाठी हातात घागरी घेऊन दोन किलोमीटरची पायपीट करायची वेळ आली आहे. असलेली योजना तात्काळ सुरु करावी. तोपर्यंत पाण्याची पर्यायी सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
वृद्धांसह लहान मुलांची पाण्यासाठी पायपीट
सद्यस्थितीत महिला, वृद्ध आणि लहान मुलांना दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्यासाठी घागरी आणि हंडे घेऊन उन्हात पायपीट करावी लागते. जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत मंजूर असलेले पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले असते, तर आज या गावाला ही वेळ आली नसती, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. काम का रखडले? यावर कुठलीही स्पष्टता प्रशासनाकडून मिळत नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने योजनेचं काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तात्पुरती सोय करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
