Kolhapur : पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाच्या पडताळणीनंतर धक्कादायक बाब समोर
Kolhapur News : कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीसंदर्भात प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती खोटी असल्याचं एबीपी माझाच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलं.

कोल्हापूर: पंचगंगा नदीची पाणी पातळी दिवसभर प्रचंड वेगानं वाढत आहे ही आकडेवारी आपण दिवसभर पाहत होतो. मात्र ही आकडेवारी खरी नाही हे दिवस संपताना समोर आलेलं आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सकाळच्या तुलनेत तीन ते चार इंचानं कमी झाली आहे. सरकारी आकडेवारी पंचगंगा नदीची पाणी पातळी 2 फुटानं वाढल्याचं सांगितलं जातं होतं. एबीपी माझाच्या पडताळणीत सरकारी आकडेवारी चुकीची असल्याचं समोर आलं.
प्रशासनाकडून पंचगंगा नदीच्या पातळीसंदर्भात दिली जाणारी आकडेवारी खोटी असल्याचं एबीपी माझानं समोर आणलं. आकडेवारीनुसार पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फूट दाखवली जाते. ज्यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फूट असते त्यावेळी नदीचं पाणी पात्राबाहेर पडलेलं असतं. प्रत्यक्षात पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर गेलेलं नसल्याचं स्पष्ट झालं.
सरकारी आकडेवारी दिली जाते त्यात चूक का करण्यात येते असा सवाल उपस्थित होत आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील याची चौकशी करण्यात आली. यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी मोजणारा कर्मचारी राजाराम बंधाऱ्यावर उपस्थित न राहता पाण्याची पातळी वाढल्याची माहिती देत होता.राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी मोजली जाते. प्रत्यक्षात तिथं न जाता कागदोपत्री आकडेवारी दिली जात होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.संबंधित विभागाला नोटीस दिली जाणार असल्याची माहिती आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून दिली जाणारी पंचगंगेच्या पाणीपातळी चुकीची असल्याचं समोर आलं आहे. एबीपी माझा ने प्रशासनाची चूक निदर्शनास आणून दिली. दिवसभरात पंचगंगेची पाणी पातळी दोन ते अडीच फुटानं वाढल्याची आकडेवारी दिली गेली होती. प्रत्यक्षात पंचंगेच्या पाणी पातळी कोणतीच वाढ झाली नसल्याचं समोर आलं. आकडेवारीची तफावत लक्षात येतात जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी मोजणारा कर्मचारी उपस्थित न राहताच आकडेवारी देत होते हे उघड झालं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला नोटीस काढून खुलासा मागवला आहे. पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन 24 तास होण्याच्या आधीच पावसाळ्यामध्ये प्रशासनाच्या कारवाईचा नमुना समोर आला आहे.