ट्रेंडिंग
Operation Sindoor : भारतीय सैन्याचा विजयी जल्लोष तर पाकिस्तानी सैनिक खांदे पाडून उभे; रगणाड्यावर चढून शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचं हसू केलं
India Attack On Pakistan : पाकिस्तानी सैन्याने भारताकडून तुफान मार खाल्ला. पराभूत सैनिकांची देहबोली काय असते हे पाकिस्तानी सैन्याची दृश्य पाहिल्यानंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही.
मुंबई : पाकिस्तानला चारीमुंड्या चित करणाऱ्या भारतीय जवानांचं आधी पंतप्रधान मोदींनी मनोबल उंचावलं. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंहही काश्मीरमध्ये पोहोचले. अधिकारी आणि जवानांची भेट घेत संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या धडाकेबाज कामगिरीची दखल घेत पाठीवर शाबासकी थाप दिली. यावेळी राजनाथ सिंहांनी खोटारड्या पाकिस्तानचे दावे खोडून काढत पाकिस्तान पुन्हा एकदा इशाराही दिला. पण दुसरीकडे पाकिस्तानमध्ये काय चित्र आहे? जाणून घेऊयात या रिपोर्टमधून,
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारताच्या विजयी योद्ध्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप... संरक्षणमंत्री राजनाथ सिंहाकडून भारताच्या सैनिकांचं कौतुक... संपूर्ण जगाला भारतीय पराक्रमाचा संदेश देणारी ही दोन दृश्यं. दुसरीकडे पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सैनिकांची भेट घेतली तेव्हाची दृश्य पाहिली तर सैनिकांचा उत्साह वाढवायला आलेत की सांत्वन करायला असा प्रश्न कुणालाही पडेल.
पाकिस्तानच्या भारताला पोकळ धमक्या
सियालकोटजवळच्या पसरूर लष्करी तळावर त्यांनी रणगाड्यावर चढून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी सैनिकांशी संवाद साधला. मात्र सैनिकांचा उत्साह वाढवण्याऐवजी इथेही भारताला पोकळ धमक्या देत त्यांनी तोंडाच्या वाफा दवडल्या.
पाकिस्तानी सैन्याने भारताकडून तुफान मार खाल्ला. त्याचे पुरावेही भारताने पत्रकार परिषद घेऊन जगासमोर सादर केले. पराभूत सैनिकांची देहबोली काय असते हे पाकिस्तानी सैन्याची दृश्य पाहिल्यानंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही.
भारतीय सैन्याचा विजयाचा जल्लोष
पाकिस्तानी सैन्याला तुफान मार दिल्यावर भारतीय सैनिकांचा उत्साह स्पष्ट दिसतोय. पंतप्रधान मोदी भेटीसाठी आल्यावर सैनिकांनी केलेला एकच जल्लोष, पंतप्रधानांची सैनिकांच्या पाठीवर थाप विजयाची ग्वाही देतोय. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैनिक पराभवामुळे खांदे पाडून त्यांच्या पंतप्रधानांसमोर उभे राहिले. भारतीय आक्रमणासमोर त्यांची झालेली मानहानी चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होती.
विशेष म्हणजे दोन्ही पंतप्रधानांनी सैनिकांशी बोलताना केलेला शब्दांचा वापर, त्याचा आशय हे ही खूप महत्त्वाचं आहे. भारताच्या पंतप्रधानांनी विजयी सैनिकांचा गौरव केला. तर पाकिस्तानी पंतप्रधान पोकळ धमक्या देण्यातच धन्यता मानत राहिले.
जगात पाकिस्तानचे पुन्हा हसं झालं
आदमपूर एअरबेसवर मारा करून भारताची एस 400 सिस्टीम नष्ट केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अगदी सुस्थितीत असलेला भारताचा हवाई तळ, त्यावरची एस 400 सिस्टीम, मिग 29 विमान दिसत होतं. तर भारताने मारा केलेल्या पसरूर तळावर पाकिस्तानला पंतप्रधानांना उभं राहण्यासाठी कॅमोफ्लॅज केलेली रणगाडे आणावे लागले.
उद्ध्वस्त तळ, तळाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा पाहता 10 मे या दिवशी इथे किती हलकल्लोळ उडाला होता हे दिसून येतंय. त्यामुळे पराभूत सैनिकांसमोर फुशारक्या मारून पाकिस्तानी पंतप्रधानांनी काय मिळवलं त्यांचं त्यांनाच माहिती. मात्र या कॉपी पेस्ट करण्याच्या हव्यासामुळे जगात पुन्हा एकदा पाकिस्तानचं हसं झालं आहे.